पाणी चोरीची नवीन शक्कल
By Admin | Updated: December 21, 2015 01:35 IST2015-12-21T01:35:55+5:302015-12-21T01:35:55+5:30
शहरात सध्या पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचा मुबलक प्रमाणात वापर करणाऱ्या नवी मुंबईकरांना पाण्याची काटकसर करताना कसरत करावी लागत आहे

पाणी चोरीची नवीन शक्कल
नवी मुंबई : शहरात सध्या पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचा मुबलक प्रमाणात वापर करणाऱ्या नवी मुंबईकरांना पाण्याची काटकसर करताना कसरत करावी लागत आहे. याचा परिणाम म्हणून पाण्याची सर्रासपणे चोरी केली जात आहे. या प्रकाराला प्रशासनाच्या संबंधित विभागाची मूक संमती असल्याने जलमाफियांचे चांगलेच फावल्याचे दिसून आले आहे.
शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु यावर्षी धरणलोट क्षेत्रात कमी पाऊस पडला. त्यामुळे धरणाची जलपातळी खालावली आहे. सध्या धरणात पुढील चार महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने शहरात २५ टक्के पाणीकपात केली आहे. असे असले तरी पाण्याच्या काटसरीची सवय नसलेल्या शहरवासीयांना ही पाणीकपात न रुचणारी ठरली आहे. परिणामी आवश्यक तितके पाणी मिळविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. गावठाणात अनेकांनी अधिकृत जलवाहिनीला समांतर अनधिकृत जलवाहिन्या टाकल्या आहेत. त्यामुळे समान जलवाटपाच्या धोरणाला हरताळ फासला जात आहे.
अनधिकृत जलवाहिन्या टाकलेल्या इमारतींना मुबलक प्रमाणात पाणी मिळत आहे. तर केवळ अधिकृत जलवाहिनीवरच अवलंबून असणाऱ्या इमारतींना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. कोपरखैरणेसह घणसोली, ऐरोली, जुहूगाव, वाशीगाव, सानपाडा आदी गावठाण क्षेत्रात हा प्रकार सर्रास आढळून येतो. विशेष म्हणजे संबंधित विभागाकडून या प्रकाराकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)