भिवपुरी रोड स्टेशनवर पोलीस चौकी उभारण्याची आवश्यकता
By Admin | Updated: June 20, 2015 23:34 IST2015-06-20T23:34:56+5:302015-06-20T23:34:56+5:30
मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेमार्गावरील भिवपुरी रोड रेल्वे स्थानक येथे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकी उभारावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

भिवपुरी रोड स्टेशनवर पोलीस चौकी उभारण्याची आवश्यकता
नेरळ : मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेमार्गावरील भिवपुरी रोड रेल्वे स्थानक येथे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकी उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टीच्या आठवले गटाच्या वतीने अशा आशयाचे निवेदन कर्जत स्टेशनवरील रेल्वे पोलीस प्रमुख बी. एस. जाधव यांना देण्यात आले. मोठ्या संख्येने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच प्रवासीवर्गाच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्या वतीने अशी चौकी उभारली गेल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.
भिवपुरी रोड रेल्वेस्थानकाचा शुभारंभ टाटा विद्युत प्रकल्प सुरू असताना झाला. त्यावेळी सध्याच्या स्थानकातून भिवपुरी येथील विद्युत प्रकल्प येथे मालवाहू गाडी सोडली जायची. या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आता प्रचंड वाढली आहे. त्यातच या भागात आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी भिवपुरी रोड स्टेशनवरून ये-जा करीत असतात. अशा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकामध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था रेल्वे प्रशासनाने ठेवलेली नाही.
पूर्वी येथे होमगार्ड दिवस-रात्र असायचे. त्यांची देखील हजेरी गेल्या काही महिन्यांपासून दिसेनाशी झाली आहे. या स्थानकामध्ये आणि परिसरात काही गंभीर प्रकार घडल्यास कर्जत रेल्वे स्टेशनमध्ये असलेल्या पोलीस आणि आरपीएफ जवान यांना पाचारण करावे लागते. सध्या भिवपुरी परिसरात धबधबे तयार झाले असून येथे येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यावेळी अनेकदा वाद होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रेल्वे स्टेशनमधील रेल्वे कर्मचारी यांना केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागते.
त्यामुळे सातत्याने होणाऱ्या घटना लक्षात घेऊन या भागातील लोकांनी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून कर्जत रेल्वे पोलीस ठाणे येथील निरीक्षक बी. एस. जाधव यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी रिपाइंचे उपतालुका अध्यक्ष उत्तम गायकवाड यांनी हे निवेदन दिले. त्यांच्यासोबत किशोर गायकवाड आदी होते. दरम्यान, किमान पोलीस चौकी उभारून भिवपुरी रोड स्टेशनवरील प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी मान्य केल्यास या ठिकाणी प्रवासी आणि स्टेशन परिसर यांची देखील सुरक्षा होऊ शकते. (वार्ताहर)