राष्ट्रीय निर्यातीतील महाराष्ट्राचा वाटा वाढवण्याची आवश्यकता : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:06 IST2021-09-22T04:06:46+5:302021-09-22T04:06:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रीय निर्यातीतील महाराष्ट्राचा वाटा आणखी वाढवण्याची आवश्यकता असून, निर्यातीला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका असलेले ...

Need to increase Maharashtra's share in national exports: Raosaheb Danve | राष्ट्रीय निर्यातीतील महाराष्ट्राचा वाटा वाढवण्याची आवश्यकता : रावसाहेब दानवे

राष्ट्रीय निर्यातीतील महाराष्ट्राचा वाटा वाढवण्याची आवश्यकता : रावसाहेब दानवे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रीय निर्यातीतील महाराष्ट्राचा वाटा आणखी वाढवण्याची आवश्यकता असून, निर्यातीला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका असलेले सेझ, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र सुदृढ करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे वाणिज्य उत्सव निर्यात परिषदेच्या उद्घाटन सत्रात यांनी केले.

विदेश व्यापार महासंचालनालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि राज्याचा उद्योग विभाग, रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय वाणिज्य उत्सव निर्यात परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुंबईत जागतिक व्यापार केंद्र येथे झाले. उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे याही यावेळी उपस्थित होत्या.

आर्थिक शक्ती म्हणून भारताचे दर्शन घडवणे ही या परिषदेची संकल्पना आहे. निर्यात प्रोत्साहनासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे साहाय्य, निर्यात केंद्र म्हणून महाराष्ट्र, अन्नप्रक्रिया क्षेत्र, निर्यात संधी यासारख्या विषयावर परिसंवाद यांचा या परिषदेत सहभाग आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्घाटनपर भाषणात आत्मनिर्भर भारत उपक्रम आणि निर्यातीला चालना आणि आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न याबाबत माहिती दिली. भारत आर्थिक महासत्ता व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भारत ही जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था ठरल्याचे सांगताना आपल्याला आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर्स करण्याचे आपले उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टासह आत्मनिर्भर भारत अभियान सुरू करण्यात आल्याचे दानवे म्हणाले. २०२१-२२ या वित्तीय वर्षात निर्यात उद्दिष्ट ४०० अब्ज डॉलर्स ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

राज्याचे उद्योग आणि खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, राष्ट्राच्या जीडीपी तसेच निर्यातीत महाराष्ट्राची महत्त्वपूर्ण भूमिका आणि वाटा आहे. तसेच भविष्यात देशाच्या निर्यात वृद्धीत महाराष्ट्र आघाडीवर राहील. तर, ही परिषद महाराष्ट्रातील निर्यातीला वेगळ्या स्तरावर प्रोत्साहन आणि उत्तेजन देण्यासाठी मदत करेल. सूक्ष्म, लघु, मध्यम, मोठ्या औद्योगिक क्षेत्रांच्या बाबतीत महाराष्ट्राने अग्रणी भूमिका बजावली आहे. ही परिषद आम्हाला मत्स्यव्यवसाय, कृषी आणि वस्त्रोद्योग यांना इतर उद्योगांसारखी एकत्र आणण्यास आणि संबंधित क्षेत्रातील निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मदत करेल, असे राज्यमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.

Web Title: Need to increase Maharashtra's share in national exports: Raosaheb Danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.