नवी मुंबईत विजयोत्सवाचा रंग!
By Admin | Updated: February 16, 2015 04:58 IST2015-02-16T04:58:50+5:302015-02-16T04:58:50+5:30
विश्वचषकातील भारत विरुध्द पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानाचा दमदार पराभव केल्यानंतर नवी मुंबईकरांनी

नवी मुंबईत विजयोत्सवाचा रंग!
नवी मुंबई : विश्वचषकातील भारत विरुध्द पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानाचा दमदार पराभव केल्यानंतर नवी मुंबईकरांनी रविवारी सायंकाळी गल्ली-बोळांसह रस्त्यांवर आणि चौकाचौकांत विजयाचा आनंद एकमेकांचे तोंड गोड करत साजरा केला.
रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून सुरु झालेला भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरातील सार्वजनिक मित्र मंंडळांनी मंडळाच्या कार्यालयांत टीव्ही बसविला होता. सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. मंडळांचे कार्यकर्ते मंडळाच्या कार्यालयांत सामन्याचा मनमुराद आनंद लुटत होते. तर शहर आणि उपनगरातील चाळींतल्या प्रत्येक घरात आज सासू-सुनांच्या मालिकांऐवजी फक्त आणि फक्त क्रिकेटचाच फिव्हर चढला होता. भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारल्यानंतर प्रत्येक शॉटला मुंबईकरांची दाद मिळत होती. जणूकाही प्रत्यक्षात आपणच फलंदाजीसाठी खेळपट्टीवर उतरलो आहोत; असा आनंद क्रिकेटप्रेमींना झाला होता.
विराट कोहलीने खेळलेली दमदार खेळी आणि त्याला साथ देत अर्धशतक ठोकणाऱ्या शिखर धवनाची फलंदाजी पाहण्यासाठी घरगल्ल्यांसह चौकांमधील टीव्ही शॉपही हाऊसफुल्ल झाले होते. भारताची फलंदाजी पूर्ण होईपर्यंत म्हणजेच सकाळपासून दुपारपर्यंत शहरातील प्रमुख रस्त्यांवर महत्त्वाची कामे करण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक वगळता उर्वरित नवी मुंबईकरांना सामना पाहण्यासाठी स्वत:ला झोकून दिले होते. भारताची फलंदाजी आणि पाकिस्तानची गोलंदाजी पाहताना मुंबईकरांनी खास जेवणाचा बेत देखील आखल्याचे काही क्रिकेटप्रेमींनी सांगितले. शहरातील रेस्तराँ दुपारी तुडुंब भरले होते. भारताच्या फलंदाजीदरम्यान लागणारे षटकार आणि चौकार आणि गडी बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंच्या नावे बोटे मोडण्यात संपूर्ण शहर रविवारी न्हाहून निघाले होते.