Join us

अरुंद रस्ते! सांगा, चालायचे कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 13:33 IST

अरुंद रस्ते, वाहतूककोंडीने सांगा चालायचे कुठून, असा सवाल मुंबईकर विचारत आहेत.

मुंबई : नागरिकांचा प्रवास सुकर होण्यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रोचे जाळे विणले जात आहे. मात्र नियोजनाचा अभाव, कामात दिरंगाई आणि कासवगतीने सुरू असलेले काम पाहता या पायाभूत सुविधांचा फटका मुंबईकरांनाच बसत आहे. अरुंद रस्ते, वाहतूककोंडीने सांगा चालायचे कुठून, असा सवाल मुंबईकर विचारत आहेत.

मानखुर्द मंडाले ते डीएननगर अशी मेट्रो २ ब धावणार असून, या मार्गिकेचे काम सध्या सुरू आहे. एमएमआरडीने हे काम हाती घेण्यात आले तरी मेट्रोचे पिलर उभारणी व इतर बांधकामांनी मुंबईचे रस्ते अडवले असून, या कामांमुळे रस्त्यांची पार दैना झाली आहे. पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे.

नियोजनाच्या अभावामुळे मोठा मनस्तापमेट्रोची कामे करण्यापूर्वी एमएमआरडीए आणि मुंबई महापालिकेने त्याचे योग्य प्रकारे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, या दोघा यंत्रणांमध्ये नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याने मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अरुंद रस्त्यावर फेरीवाले-  मुंबईच्या रस्त्यालगत असलेल्या पदपथावरून चालणे जिकिरीचे झाले आहे. - फेरीवाल्यांनी आधीच हे पदपथ गिळंकृत केले असून, त्यावर वर्षानुवर्षे फेरीवाले व्यवसाय करत आहेत. -  मंडाले येथे २२ हेक्टर परिसरात मेट्रो कारशेड तयार होत आहे. 

मेट्रो ३ च्या मार्गातील मानखुर्द पूर्व-पश्चिमेला जोडणारा नवीन उड्डाणपूल अनेक दिवस झाले तरी वाहतुकीला सुरू केलेले नाही. ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. हे पूल सुरू केल्यास येथील वाहतूककोंडी नक्कीच फुटेल. 

टॅग्स :वाहतूक कोंडीरस्ते सुरक्षा