Join us  

मुरुड - जंजिरा किल्ल्यावर गस्त सुरू, अतिवरिष्ठ अधिकारी करणार पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 4:31 AM

दुरवस्थेबरोबरच सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नसलेल्या ऐतिहासिक मुरुड - जंजिरा किल्ल्याकडे आता पोलिसांची नजर वळली आहे.

- जमीर काझीमुंबई  - दुरवस्थेबरोबरच सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नसलेल्या ऐतिहासिक मुरुड - जंजिरा किल्ल्याकडे आता पोलिसांची नजर वळली आहे. ‘लोकमत’ने किल्ल्याच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी चव्हाट्यावर आणल्यावर सोमवारी सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलाचे (कोस्टल गार्ड) जवान व स्थानिक पोलिसांकडून या ठिकाणी गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली. लवकरच एसआयडीचे अतिवरिष्ठ अधिकारी किल्ल्याची पाहणी करणार आहेत.चोहोबाजूंनी समुद्र असलेला मुरूड-जंजिरा किल्ला देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारे एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. रायगड जिल्ह्यातील जंजिरा किल्ल्याची उभारणी १६ व्या शतकात सिद्धी अंबरने केली होती. २० एकर परिसरातील हा दुर्ग सध्या भग्नावस्थेत आहे, तसेच सुरक्षाव्यवस्थेची प्रचंड वानवा आहे. तो केव्हाही अतिरेक्यांच्या टार्गेटवर येऊ शकतो, पर्यटकांना ओलिस धरण्यासाठी त्याचा दहशतवाद्यांकडून वापर केला जाऊ शकतो असे वृत्त ‘लोकमत’ने सोमवार, दि. १ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केले. त्यानंतर तपास यंत्रणा खडबडून जागी झाली.किल्ल्याच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सागरी सुरक्षा (कोस्टल गार्ड) व रायगड जिल्हा पोलिसांना या ठिकाणी नियमित स्वरूपात गस्त घालण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याचबरोबर येत्या आठवडाभरात या ठिकाणी गुप्त वार्ता विभागाचे वरिष्ठ अधिकारी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतील. त्यानंतर त्याठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित केली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

‘वेठीस धरू नये’किल्ल्याच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधल्याबाबत स्थनिकांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीचे आभार मानले. शासनाकडून कसलीही मदत नसताना ते पर्यटकांना मदत करून उदरनिर्वाह चालवीत आहेत, याठिकाणी सुरक्षाव्यवस्था कायमस्वरूपी ठेवली पाहिजे. साेबतच तपास यंत्रणेकडून स्थानिक रहिवाशांना विनाकारण वेठीस धरले जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :रायगडमुंबई