Join us  

भांडुपमध्ये हातगाडी लावण्यावरून झालेल्या वादात धारदार शस्त्राने वार; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 7:43 PM

अब्दुल अली खान, त्यांचा मुलगा सैबाज अब्दुलअली खान आणि सादाब अब्दुल्ला अली खान यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.

मुंबई : भाजी विक्रीसाठी हातगाडी लावण्याच्या कारणावरून पिता-पुत्रांवर सशस्त्र हल्ला करून तिघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना भांडुप (प.) येथील सोनापूर येथे रविवारी सायंकाळी घडली. या भीषण हल्ल्यात अब्दुल अली खान (वय ५०), त्यांची मुले सैबाज (२५) व सादाब (२३) यांचा मृत्यू झाला असून हल्लेखोरांचा शोध रात्री उशिरापर्यंत लागलेला नव्हता. त्यांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके पाठवल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.सैबाज खान हा घटनास्थळीच ठार झाला होता, अब्दुुल व सादाब खान यांचा मुलुंड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिघांच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले होते.सोनापूर येथील झकेरिया कंपाउंडच्या झकेरिया मशिदीच्या मागील परिसरात खान पिता-पुत्र भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी साडेपाचच्या सुमारास नेहमीच्या जागेवर हातगाडी लावली असताना त्या ठिकाणी असलेल्या दुस-या विक्रेत्याने त्याला विरोध केला. त्यावरून त्यांच्यात झटापट झाली. त्या वेळी तिघांनी आपल्याजवळील तीक्ष्ण हत्याराने खान पिता-पुत्रावर हल्ला केला. वडिलांवरील वार चुकविण्यासाठी पुढे आलेल्या सैबाजच्या पोटावर जोरदार वार केले. तो रक्तबंबाळ होऊन खाली पडल्यानंतर अन्य दोघांवर वार केले. त्यांच्या आरडाओरड्याने नागरिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली असता हल्लेखोरांनी पलायन केले. तिघा जखमींना तातडीने मुलुंड रुग्णालयात नेण्यात आले. सैबाजचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांवर उपचार सुरू असताना रात्री आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांचा शोध लागलेला नव्हता.

टॅग्स :खूनगुन्हा