महापालिका सज्ज!

By Admin | Updated: May 28, 2014 23:35 IST2014-05-28T23:29:42+5:302014-05-28T23:35:15+5:30

मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि महापौर यांच्यात झालेल्या बैठकीत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यात पावसासाठी मनपा प्रशासन सज्ज असून सुमारे ८५ टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याची माहिती महापौर सुनिल प्रभु यांनी दिली.

The municipality is ready! | महापालिका सज्ज!

महापालिका सज्ज!

मुंबई : मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि महापौर यांच्यात झालेल्या बैठकीत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यात पावसासाठी मनपा प्रशासन सज्ज असून सुमारे ८५ टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याची माहिती महापौर सुनिल प्रभु यांनी दिली.
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रभु म्हणाले, एमएमआरडीए, म्हाडा, नौदल, लष्कर, रेल्वे प्रशासन अशा विविध प्रशासन आणि प्राधिकरणांसोबत पालिकेने आढावा बैठक घेतली आहे. त्यात रस्ते, नालेसफाई आणि आरोग्य सेवांचा आढावा घेण्यात आला. शहर आणि उपनगरातील सुमारे ८५ टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. तर रस्त्यांची समाधानकारक कामे झाल्याचे महापौरांनी सांगितले. ज्याठिकाणी कामे शिल्लक राहिली आहेत, त्या प्रशासनांना कामे तात्काळ पूर्ण करण्याचे पत्र देण्यात आले आहे.
विविध भागातील पावसाची नोंद व्हावी म्हणून ६५ ठिकाणी पर्जन्यमापक संयंत्रे बसवण्यात आली आहे. नाल्यांच्या १८५ पातमुखांची सफाई करण्यात आली आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीतील मिठी नदीची साफसफाई करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
शिवाय आपत्कालीन परिस्थितीसाठी ३ हजार ८३१ बेड्सची सोय करण्यात आली आहे. डेंग्यू व मलेरियाबाबतची अद्ययावत माहिती भ्रमणध्वनी व संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहेत. अग्निशमन दलाची ६ कमांडींग सेंटर्स कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी सर्व साधनांसह सज्ज करण्यात आली आहेत. ६ चौपाट्यांवर ५१ जीवरक्षक नेमण्यात आले आहेत.
...........

हवामानाची माहिती
पाऊस आणि हवामानाची माहिती देणारे ॲपही पालिकेने तयार केले आहे. त्यामुळे लोकांना पावसाचा आणि हवामानाची वेळोवेळी माहिती मिळत राहील. शिवाय शहरात कोणत्या ठिकाणी पाणी भरले, किंवा पावसाळ्यात कोणत्या आजाराची साथ पसरली आहे, त्याची माहिती मिळण्यास मदत होईल.
...........
सर्व रस्ते ताब्यात द्या - महापौर
मुंबईतील काही रस्ते महापालिकेच्या अख्तारित येत असून बहुतेक रस्ते हे राज्य शासन, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि विविध प्राधिकरणांच्या ताब्यात आहेत. मात्र कोणत्याही रस्त्यावर खड्डे आढळल्यास त्याचे खापर पालिकेवर फोडण्यात येते. शिवाय विविध प्राधिकरणांमध्ये समन्वय नसल्याने रस्त्यांची कामेही अर्धवट राहतात. परिणामी सर्व रस्त्यांची जबाबदारी एकाच यंत्रणेकडे म्हणजेच पालिकेकडे देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे प्रभु यांनी सांगितले. त्यात रस्त्यांच्या खर्चासह महसूलही पालिकेच्या ताब्यात राहील, असेही ते म्हणाले
...........
 

Web Title: The municipality is ready!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.