पालिका अधिकारी तरीही नॉट रिचेबल
By Admin | Updated: May 28, 2014 01:45 IST2014-05-28T01:45:43+5:302014-05-28T01:45:43+5:30
महापालिका अधिकारी नागरिकांच्या २४ तास संपर्कात राहण्यासाठी आयुक्तांनी मोबाइल दिले. मात्र काही दिवसांतच त्यांचे मोबाइल ‘नॉट रिचेबल’ दाखवीत असल्याने या चांगल्या योजनेचा बोजवारा उडाला आहे

पालिका अधिकारी तरीही नॉट रिचेबल
सदानंद नाईक, उल्हासनगर - महापालिका अधिकारी नागरिकांच्या २४ तास संपर्कात राहण्यासाठी आयुक्तांनी मोबाइल दिले. मात्र काही दिवसांतच त्यांचे मोबाइल ‘नॉट रिचेबल’ दाखवीत असल्याने या चांगल्या योजनेचा बोजवारा उडाला आहे. पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी पालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी विविध योजना राबविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अधिकारी २४ तास नागरिकांच्या संपर्कात राहण्यासाठी लाखो रुपये खर्चून मोबाइलचे वाटपही केले. या योजनेतून १३४ अधिकार्यांना मोबाइल दिल्यानंतर ते नागरिकांच्या संपर्कात राहणार असल्याच्या कल्पनेला काही महिन्यांतच तडा गेला. बहुतांश अधिकार्यांचे मोबाइल हे नॉट रिचेबल झाले आहेत. मालमत्ता विभागातील साडेचार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन पाच उपायुक्तांना जेलची हवा खावी लागली आहे. तसेच नगररचनाकारासह अन्य अधिकार्यांना लाचप्रकरणी अटक झाल्याने अतिक्रमण विभाग नेहमीच वादाच्या भोवर्यात सापडला आहे. पाणीपुरवठा विभागाला कार्यकारी अभियंत्ता नसल्याने पाण्याचाही ठणठणाट आहे. अधिकारी २४ तास नागरिकांच्या संपर्कात राहण्यासाठी पुन्हा मोबाइल योजना राबविण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला आहे. महापालिकेतील अनेक पदे अधिकारीविना रिक्त असून अधिकार्यांची मागणी राज्य शासनाकडे केल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. नगररचनाकार, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, तज्ज्ञ समितीतील विविध पदे, भांडार विभागप्रमुख पद, शहर अभियंत्ता आदी विविध पदे अधिकारीविना रिक्त आहेत.