Join us  

महापालिका उभारणार सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 3:10 PM

wastewater recycling center : मालाड येथे सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र उभारणार आहे.

मुंबई : मुंबईतल्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट समुद्रात सोडले जात असल्याची टिका झाल्यानंतर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कान टोचल्यानंतर आता कुठे मुंबई महापालिका पुन्हा एकदा खडबडून जागी झाली आहे. आणि त्यानुसार, मुंबई महापालिका आता मालाड येथे सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र उभारणार आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे.

मालाड येथील सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्राच्या सल्लागारांवर ५५ कोटी २५ लाख ९७ हजार ५०० रुपये खर्च केले जाणार आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट समुद्रात सोडले तर त्यामुळे सागरी पर्यावरण धोक्यात येते. जैव विविधतेची हानी होते. याचा सारासार विचार करत यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्बंध घातले आहेत. आणि त्यानुसार, मुंबई महापालिकेच्या स्तरावर सांडपाणी केंद्राच्या कामास गती मिळणार असतानाच स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव सादर होणार आहे.

दरम्यान, महापालिकेच्या मल:निस्सारण विभागाच्या वतीने जोहूकासु सांडपाणी प्रक्रिया सयंत्र नुकतेच भांडुप संकुल येथे बसविण्यात आले. जपानी तंत्रज्ञानावर आधारित सयंत्रामुळे प्रतिदिन १० हजार लिटर पाणी स्वच्छ होऊन पिण्या व्यतीरिक्त इतर कामांसाठी पाण्याचा वापर करणे शक्य होईल. हे पाणी महापालिका उद्याना व्यतिरिक्त वाहने धुणे, शौचालयाच्या वापरासाठी याचा उपयोग करणे शक्य होईल.

-------------------

मुंबईला दररोज ३ हजार ८०० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो.२ हजार ७०० दशलक्ष लीटर पाणी सांडपाण्याच्या रुपात समुद्रात जाते.

-------------------

मुंबई महापालिका सात ठिकाणी अशी केंद्रे उभारत आहे.कुलाबा, वरळी, धारावी, वांद्रे येथे केंद्र उभारली आहेत.

-------------------

वर्सोवा, घाटकोपरसाठी सल्लागार नेमले आहेत.आता मालाडसाठी काम केले जात आहे.

------------------- 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई