मुंबई : मध्य रेल्वेच्यामुंब्रा स्थानकाजवळ ट्रेन अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर नऊ प्रवासी जखमी झाले. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. प्राथमिक माहितीनुसार, घटना घडली तेव्हा फूटबोर्डवर उभ्या असणाऱ्या दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये फक्त ०.७५ मीटर अंतर होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - कर्जत लोकलमधून बॅगसह प्रवास करणारा प्रवासी या घटनेला कारणीभूत असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे.
संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, सीसीटीव्ही फूटेजचे निरीक्षण केले असता सीएसएमटीहून कर्जतला जाणाऱ्या लोकलमधून खांद्यावर बॅग घेऊन फूटबोर्डवर उभा असलेल्या एका प्रवाशाने हात बाहेर काढला होता.
तो कसा पडला हे समजलेले नाही. परंतु, ट्रेन मुंब्रा येथून जात असताना तो कसा तरी फूटबोर्डवरून पडला आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या जीआरपी पोलिसाला धक्का बसला. बॅग घेतलेला हा प्रवासी सीएसएमटी दिशेला जाणाऱ्या ट्रेनमध्ये फेकला गेला व काही प्रवाशांना धडकला.
... यामुळे पेच
सकाळची गर्दीची वेळ असल्याने कसाराहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. मात्र, सीएसएमटीहून कर्जतला जाणाऱ्या ट्रेनमध्ये गर्दी नव्हती.
मुंब्रा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर बसविलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोन्ही गाड्या दिसत आहेत; परंतु, दोन्ही रेल्वे मार्गांच्या मध्यभागी जिथे हे प्रवासी चालत्या ट्रेनमधून पडले त्या भागाचा समावेश नसल्याने या घटनेला कारणीभूत असलेल्या घटनांची मालिका एकत्र करणे कठीण जात आहे. दरम्यान, तपासासाठी नेमलेली समिती एका आठवड्यात अंतिम अहवाल सादर करेल, त्यानंतर गोष्टी अधिक स्पष्ट होतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.