Join us  

मुंबईची वीजटंचाई लवकरच दूर होणार, विद्युत वाहिन्यांसाठी शासनाने दिली १२८ एकर वन जमीन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 8:00 AM

ही वन जमीन अदानींच्या खारघर-विक्रोळी वीज पुरवठा कंपनीकडे वळती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं ८ फेब्रुवारी रोजी घेतल्याची सूत्रांची माहिती.

नारायण जाधवमुंबईची विजेची गरज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या उद्योगपती गौतम अदानींच्याअदानी पॉवरकडे मुंबईच्या बहुतेक भागात वीज पुरवठ्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वीजटंचाई दूर करण्यासाठी अदानी समूहाच्या खारघर-विक्रोळी वीज पुरवठा कंपनीला ४०० के.व्ही.च्या विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी वन खात्याच्या मालकीची ५७.५०९२ हेक्टर अर्थात १२८ एकर ७७ गुंठे वन जमीन देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईची वीजटंचाई दूर होऊन मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वीज पुरवठ्यात अनेकदा व्यत्यत आला. यामुळे तो दूर करण्यासाठी अदानी कंपनीने खारघर-विक्रोळी वीज पुरवठा कंपनी स्थापन केली असून, त्या कंपनीद्वारे नवी मुंबईतील खारघरपासून मुंबईतील विक्रोळीपर्यंत १५०० मेगावॅट वीज वाहून नेण्यासाठी ४०० के.व्ही.च्या उच्चदाब वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहेत.

मुंबईसाठी महत्त्वाचा प्रकल्पहा प्रकल्प मुंबई शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे मुंबईत अतिरिक्त वीज आणणे शक्य होऊन शहराची भविष्यातील मागणी पूर्ण करणे शक्य होणार आहे. अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला डिसेंबर २०१९ मध्ये प्रकल्पासाठी एलओआय प्राप्त झाला होता. त्यानंतर आता त्यासाठी ही वन जमीन अदानींच्या खारघर-विक्रोळी वीज पुरवठा कंपनीकडे वळती करण्याचा निर्णय ८ फेब्रुवारी २०२२ रोजी घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

उच्च न्यायालयाची परवानगी लागणारकेंद्र सरकारच्या वने आणि पर्यावरण मंत्रालयासह जलवायू मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून तसेच मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घेऊनच खारघर-विक्रोळी वीज पुरवठा कंपनीला या वीजवाहिन्या टाकाव्या लागणार आहेत.

टॅग्स :अदानीवीजमुंबई