Join us  

मुंबई, ठाण्यात विजेनं आणला वीट, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 2:42 PM

नवी मुंबई, ठाण्यात अचानक बत्ती गुल होत असल्यानं नागरिकही प्रचंड हैराण झाले आहेत. वीजपुरवठा

मुंबई- नवी मुंबई, ठाण्यात अचानक बत्ती गुल होत असल्यानं नागरिकही प्रचंड हैराण झाले आहेत. ऐन कार्यालयीन वेळेत ही वीजपुरवठा खंडित होत असल्यानं अनेकांच्या कामात व्यत्यय येत आहे.

महापारेषणच्या ४०० के.व्ही. ग्रहण केंद्र कळवा या उपकेंद्रात दिनांक ०१ जून २०१८ रोजी मध्यरात्री दीड वाजता ६०० एम.व्ही.ए.चे रोहित्र युनिट-२ मध्ये बिघाड होऊन आग लागल्यामुळे रोहित्र-१च्या केबलचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दोन्ही युनिट नादुरुस्त आहेत. महापारेषणला युनिट-१दुरुस्त करण्यास सुमारे सात दिवस तर रोहित्र-२ चालू करण्यास सुमारे ३०ते ४० दिवस लागण्याची शक्यता आहे. या बिघाडामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरण पूर्ण प्रयत्न करत आहे परंतु, तरीही महापारेषणच्या या बिघाडामुळे महावितरणच्या ग्राहकांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यात आहे. या काळात ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महापारेषणच्या या केंद्रातून महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडलातील ठाणे मंडलाअंतर्गत समतानगर, पाचपाखाडी, रहेजा कॉम्प्लेक्स, मेंटल हॉस्पिटल परिसर, कशिश पार्क, ल्युईसवाडी, संभाजीनगर, गणेशावाडी, सिद्धेश्वर तलाव, मखमली तलाव, नवपाडा, साकेत, तारांगण, राबोडी, कोपरी,विटावा, उथळ सर , कोर्ट नाका, वृंदावन, माजी वाडा, बालकुंब, खोपट, पॉवर हाऊस, कळवा,मुलुंड(पु.वप.) इ. या परिसरास तर वाशी मंडलाअंतर्गत पावणे एमआयडीसी, तुर्भे एमआयडीसी, बोनकोडे, नेरूळ, पामबीच, खारघर, कामोठे, सानपाडा, सीबीडी बेलापूर, उलवे, सी वूड, शिरवणे एमआयडीसी, घडलीय केमिकल इ. या परिसरास वीज पुरवठा होतो.  

सध्या या सर्व परिसराची वीज मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याच्या महावितरणमार्फत आटोकाट प्रयत्न सुरू आहे. मात्र तरीही विजेची मागणी वाढल्यास सध्या चालू असलेल्या यंत्रणेवर अधिकचा भार येऊन यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता असते. म्हणून मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याकरीता महापारेषण व महावितरणला विजेचे नियोजन करावे लागत आहे. या काळात आवश्यकतेनुसार ठराविक वेळेकरिता काही भागात विजेचे नियोजन करताना वीज पुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो.

महावितरण व महापारेषणचे अधिकारी व कर्मचारी तांत्रिक अडचण लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. या कालावधीत ग्राहकांनी विजेचा वापर जपून करावा, तसेच तांत्रिक कारणाने उद्भवलेल्या या अडचणीच्याप्रसंगी महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :वीजठाणेनवी मुंबई