मुंबईतील पावसाचा कोकण रेल्वेस फटका

By Admin | Updated: June 22, 2015 00:23 IST2015-06-21T22:37:19+5:302015-06-22T00:23:33+5:30

पावसाची संततधार सुरुच,,चिपळुणात पूरसदृश्य स्थिती दरड कोसळून मायलेकींचा अंत

Mumbai rains hit Konkan Railway | मुंबईतील पावसाचा कोकण रेल्वेस फटका

मुंबईतील पावसाचा कोकण रेल्वेस फटका

रत्नागिरी : कोकणासह मुंबईत पावसाने गेल्या दोन ते तीन दिवसात कहर केल्यानंतर मुंबई शहरात रेल्वे मार्गावर पाणी तुंबले. त्यामुळे मुंबईची वाहतूक ठप्प झाली. मुंबईतील स्थितीचा फटका कोकण रेल्वेलाही बसला असून गेल्या तीन दिवसांपासून कोकण रेल्वेचे वेळापत्रकच बिघडले आहे. गेल्या तीन दिवसांपासून मडगाव ते पनवेलपर्यंतच गाड्या धावत आहेत. अजूनही दोन ते तीन तास उशिराने गाड्या धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. कोकण रेल्वे मार्ग असलेल्या भागातही जोरदार पाऊस आहे. त्यामुळे त्या भागात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मात्र कोकण रेल्वे मार्गावरील बोगद्यांच्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. पंधरवड्यापूर्वीच मार्गावरील बेर्डेवाडी येथील बोगद्यात रात्रीच्यावेळी रुळांवर पाणी साचल्याने कोकण रेल्वे मार्ग २ ते ३ तास ठप्प झाला होता. मुंबईतील पावसाच्या कहरामुळे तेथे रेल्वे वाहतूक शुक्रवारी ठप्प झाली होती. अजूनही मुंबईतील वाहतूक सुरळित झालेली नाही. त्याचा परिणाम कोकण रेल्वे वाहतूकीवर झाला आहे. मडगाव ते छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या सर्वच गाड्या सध्या केवळ पनवेलपर्यंतच धावत आहेत. (प्रतिनिधी)


काही गाड्या रद्द, काही
अन्य मार्गे वळविल्या
रत्नागिरी-दादर ही पॅसेंजर रेल्वेही पनवेलपर्यंतच धावत आहे. कोकण रेल्वे मार्गावर दरदिवशी ५३ ते ५५ प्रवासी रेल्वे व मालगाड्या धावतात. मात्र पावसामुळे शनिवारी मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस तसेच मंगळूर-मुंबई या गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. लांब पल्ल्याच्या काही गाड्या अन्य मार्गे वळविण्यात आल्या. मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस तब्बल दीड तास उशिराने धावत होती.

पावसाची संततधार सुरुच
रत्नागिरी जिल्हा : राजापूर, चिपळूणला पुराची भीती कायम
रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस असून रत्नागिरी तालुक्यात रविवारीही पावसाचा जोर कायम होता. रविवारी तालुक्यात १९३ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसाने शेतमळ्यांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तालुक्यातील धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने शीळ, पानवल, हरचेरी या धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे आतापर्यंत तालुक्यात पावसामुळे दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
शनिवारी रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंत पावसाच्या जोरदार सरी सुरू होत्या. त्याचबरोबर वाऱ्याचा वेगही मोठा होता. त्यामुळे या वादळी पावसाने तालुक्याच्या ग्रामिण भागात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी झाडे तुटून पडली आहेत. रत्नागिरी शहरातील टिळक आळी येथे आंब्याच्या झाडाची मोठी फांदी रस्त्यावर पडली. त्याठिकाणी रस्त्याच्या कडेला काही उभ्या करून ठेवलेल्या गाड्या मात्र यात वाचल्या. तालुक्यातील टेंभ्ये भागात शेतमळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे भातपीकाला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी शहरातील गटाराचे पाणी साचल्याने काही रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वाहतुकीचा वेग काहीसा मंदावलेला होता.दरम्यान रविवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. रात्री उशिरापर्यंत पावसाची एकही सर पडली नव्हती. रविवारी रत्नागिरी तालुक्यात दिवसभरात तब्बल १९३ एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)


चिपळुणात पूरसदृश्य स्थिती
चिपळूण : शहर व परिसरात आज रविवारी दिवसभर संततधार पाऊस पडल्याने वाशिष्ठी व शीव नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दुपारी २.३० वाजेपर्यंत साडेचार मीटर पाण्याची पातळी वाढली असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय कार्यालयांना व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आहेत.
पोफळी, शिरगाव, अलोरे येथेही मुसळधार पाऊस पडत असून वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. शीव व वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी ५ मीटरपर्यंत गेली आहे. शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वडनाका, शीवनदी येथील झोपडपट्टी, रंगोबा साबळे रोड या मार्गावरही पुराचे पाणी आले आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अक्षरधाम बिल्डींगसमोर महिंद्र बोलेरो गाडी पाण्याचा अंदाज न आल्याने अडकली. तिला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. बाजारपूल पाण्याखाली गेला आहे.
खेर्डी परिसरात गटारे व नाले तुंबल्याने शिगवणवाडी येथे पाणी रस्त्यावर आले आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. नगर परिषदेतर्फे नागरिकांना सावध राहण्यासाठी सायंकाळी ५ वाजता ३ भोंगे वाजविण्यात आले. (वार्ताहर)


दरड कोसळून मायलेकींचा अंत
रत्नागिरी : पहिल्याच पावसामुळे रत्नागिरी शहरानजीकच्या शिरगाव बाणेवाडी येथे मोठी दरड घरावर कोसळून आईसह मुलगी ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळे संपूर्ण शिरगावमध्ये शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी रात्री सुलभा रमाकांत बाणे (४२, शिरगाव, बाणेवाडी) यांच्यासह त्यांची १५ वर्षाची मुलगी कविता रमाकांत बाणे या दोन्ही एकत्र घराच्या पडवीमध्ये काम करत होत्या. त्याचवेळी घराच्या मागील बाजूची दरड पडवीच्या भिंतीवर कोसळून पडवीच्या भिंतीचे चिरे सुलभा व त्यांची मुलगी कविता यांच्या अंगावर पडली.
या दुर्घटनेमध्ये दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात आणत असतानाच शिरगाव ते जिल्हा रुग्णालय दरम्यान सुलभा यांचा मृत्यू झाला तर कवितावर औषधोपचार सुरु असताना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली.
गेले चार दिवस पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले असून जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी झालेल्या दुर्घटनांनी सुरुवातीच्या पावसामध्ये चौघांनी आपले प्राण गमविले आहेत. (वार्ताहर)

कशेडीत दरड कोसळली, गावठाणाकडील वाहतूक बंद
खेड : तालुक्यात गेले चार दिवस सलग मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. रविवारी पहाटे सुरू झालेल्या पावसाने दुपारपर्यंत कहर केला. रस्त्यावर आणि शेतात तुडुंब पाणी भरल्याने रस्ते आणि शेत दिसेनासे झाले होते. सर्वत्र पाणीच पाणी झाले़ अशातच कशेडी येथील महामार्गावरील एक अजस्त्र दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली तर सुकिवली कडील मार्गावरील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद पडली.
महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रेन आणि एक जेसीबी कायमस्वरूपात तैनात करण्यात आला असून हा मार्ग वारंवार कोसळणाऱ्या दरडीमुळे धोकादायक बनला आहे. तालुक्यातील बससेवा मात्र साफ कोलमडली होती.
सुकिवली गावांतर्गत जाणारा मार्ग रस्ता पाण्याखाली गेल्याने बंद पडला आहे़ शिवाय रस्त्यानजीकची दरड कोसळण्याची शक्यता असल्याने येथील वाहतूकदेखील अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. सुकिवली ते करटेल मार्गावरील रस्त्यावरून पाणी जात असल्याने हा मार्ग देखील काही वेळाने बंद करण्यात येणार असल्याची माहीती उपलब्ध झाली आहे. तालुक्यातील अलसुरे, चिंचघर, तुळशी आणि नांदगाव भागात पाण्याचा मोठा साठा झाल्याने हे पाणी गावात शिरण्याची भिती निर्माण झाली आहे. खाबंतळ्यानजीकच्या झोपड्या पाण्याखाली आल्याने लोकांना नजीकच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले़ (प्रतिनिधी)

Web Title: Mumbai rains hit Konkan Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.