Join us  

Mumbai Rain Update: चांदिवली येथील संघर्षनगर येथे रस्ता खचला; रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 9:42 AM

गेल्या 24 तासांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. कुर्ला येथे घरांमध्ये पाणी गेलं आहे तर चांदिवली येथील संघर्ष नगर रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने परिसरातील स्थानिक इमारतीतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

गेल्या 24 तासांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच खाजगी आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आलेलं आहे. 

 

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हिंदमाता, सायन सर्कलसह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या. आता वांद्र्यातील कलानगरमध्येदेखील गुडघाभर पाणी साचलं आहे. विशेष म्हणजे मातोश्री बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भागात तुंबलं आहे. या भागात सकाळी नऊपर्यंत पालिकेचे कर्मचारी पोहोचलेले नव्हते. याशिवाय पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही यंत्रणादेखील उपलब्ध नाही.

तर सोमवारी रात्री दोनच्या सुमारास पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर संरक्षक भिंत कोसळली. यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. याशिवाय अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवान झाले असून बचावकार्य सुरु आहे. याचबरोबर, जखमींना जोगेश्वरी आणि कांदिवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

तर कुर्ला येथे साचलेल्या पाण्यामुळे भारतीय नौदलाची टीम परिसरात पोहचली आहे. जवळपास 1 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. तर मुंबईकरांच्या सुविधेसाठी एनडीआरएफ, अग्निशामन दल, नौदल टीम तसेच स्थानिक समाजसेवक मदतीला धावले आहेत.   

टॅग्स :मुंबईमुंबई मान्सून अपडेट