मुंबईत महापालिका हेच नियोजन प्राधिकरण असावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:25 IST2021-02-05T04:25:56+5:302021-02-05T04:25:56+5:30
आयुक्तांचे राज्य सरकारला साकडे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापालिकेच्या कारभाराचे विकेंद्रीकरण करण्यासाठी मुंबईत दोन आयुक्त नेमण्याची मागणी जोर ...

मुंबईत महापालिका हेच नियोजन प्राधिकरण असावे
आयुक्तांचे राज्य सरकारला साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेच्या कारभाराचे विकेंद्रीकरण करण्यासाठी मुंबईत दोन आयुक्त नेमण्याची मागणी जोर धरत आहे, तर आता महापालिका हे एकच नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्याची विनंती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केली आहे. त्यामुळे नवीन चर्चेला तोंड फुटणार आहे.
मुंबईत दोन महापालिका आयुक्त असावेत, अशी मागणी शहरचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी लावून धरली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणे मुंबई आणि उपनगर असे दोन पालिका आयुक्त नेमण्याची मागणी यापूर्वीही अनेकवेळा करण्यात आली. तसेच मुंबईसाठी स्वतंत्र प्राधिकरण नियुक्त करण्याची मागणीही होत आहे. मात्र, अन्य प्राधिकरणांमध्ये सर्व सुविधा पुरवत असल्याने महापालिकेलाच नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्याची विनंती आयुक्तांनी राज्य सरकारकडे केली आहे.
सध्यस्थितीत महापालिकाव्यतिरिक्त मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, म्हाडा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि मुंबई पार्ट ट्रस्ट आदी नियोजन प्राधिकरण कार्यरत आहेत. सदर प्राधिकरणांना त्यांच्या ताब्यातील भागाच्या विकासाचे नियोजन करण्याचे अधिकार आहेत. मात्र, तिथे पाणीपुरवठा, मलनिस्सारण, रस्ते, रस्त्यावरील दिवे, साफसफाई आदी सर्व पायाभूत सुविधा महापालिका पुरवत असते. परंतु, सदर प्राधिकरणांवर महापालिकेचे नियंत्रण नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे, याकडे आयुक्तांनी लक्ष वेधले आहे.
* नागरिकांकडूनच पुढे आली मागणी
अन्य प्राधिकरणांच्या जागेतील नागरिकांच्या पायाभूत सुविधांमधील समस्या सोडविताना अडचणी येत असतात. अनेक नियोजन प्राधिकरण असल्याने तेथील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होणे अशक्य झाले आहे. कफ परेड, मरिन ड्राइव्ह येथील नागरिकांकडून अशी मागणी पुढे आली होती. त्यानुसार या भागांचा ताबा महापालिकेकडे दिला जावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केल्याचे आयुक्तांनी सांगितले.
.......................