Join us  

मुंबईकर घामाच्या धारांनी त्रस्त; पाच दिवस उष्णतेची लाट 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 10:13 AM

गुजरात व मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यांत पाच दिवस उष्णतेच्या लाटसदृश स्थितीसह दमटयुक्त उष्णतेची स्थिती जाणवणार आहे.

मुंबई : मुंबईचे कमाल तापमान ३४ ते ३५ अंशांवर स्थिर राहत असले तरी आर्द्रता कमी नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत असून, मुंबईकर घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. शिवाय, मुंबई, कोकणात काही ठिकाणांसह गुजरातमध्ये पाच दिवस उष्णतेच्या लाटसदृश व दमटयुक्त उष्णतेची स्थिती जाणवेल. त्यामुळे मुंबईकरांच्या त्रासात आणखी भर पडणार आहे. गुजरात व मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यांत पाच दिवस उष्णतेच्या लाटसदृश स्थितीसह दमटयुक्त उष्णतेची स्थिती जाणवणार आहे. याचा प्रभाव मुंबई शहर, ठाणे येथे अधिक जाणवणार असून, विदर्भ, मराठवाडा येथे कमाल तापमान ४० ते ४४ दरम्यान राहणार आहे. २५ मेपर्यंत ही स्थिती जाणवू शकते. 

तसेच राज्यात २५ मेपर्यंत ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. 

४ हजार मेगावॅट विजेची मागणी-

१) उकाड्यातून सुटकेसाठी दिवसरात्र एसी, पंखे आणि कूलर चालविले जात आहेत. त्यामुळे मुंबईच्या विजेच्या मागणीत वाढ होत असून, मंगळवारी मुंबईत विजेची मागणी ४ हजार ३०७ मेगावॉट नोंदविण्यात आली.

२) मंगळवारी टाटा पॉवरकडून १ हजार ३० मेगावॉट व अदानी इलेक्ट्रिसिटीकडून २२५३ मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यात आला. 

३) इतर वेळेस मुंबईत रोज विजेची मागणी ३ हजार ५०० मेगावॉट नोंदविली जाते.

टॅग्स :मुंबईउष्माघाततापमान