Join us  

महाराज उपाधीसाठी पंतप्रधानांची लवकर भेट घेणार, खासदार गोपाळ शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 11:42 AM

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय विमानतळाच्या नावात महाराज ही उपाधीच निर्देशित करण्यात आलेली नाही.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय विमानतळाच्या नावात महाराज ही उपाधीच निर्देशित करण्यात आलेली नाही. सोमवारी लोकमत ऑनलाइनवर आणि आज लोकमत पेपरमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावर या संदर्भात उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतच्या सदर प्रतिनिधींशी दिल्लीवरून संपर्क साधला. लोकमतने यापूर्वी हा महत्त्वाचा विषय अनेकवेळा प्रभावीपणे मांडला होता. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन त्यांनी सांगितले की,या संदर्भात आपण केंद्रीय उड्डाण मंत्र्यांची भेट घेणार आहोत आणि सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात याविषयी आवाज उठवू, अशी माहिती त्यांनी दिली.

खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः शिवप्रेमी आहेत. 2014 च्या  निवडणुकीचा प्रचार पंतप्रधानांनी रायगड किल्यावर जाऊन प्रचाराचा नारळ फोडून केला होता. भाजपानं विधान सभा निवडणुकीत नेत्रदीपक कामगिरी करून  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले. तर अरबी समुद्रात काँगेसला जे अनेक वर्षे सत्तेत असून शक्य झाले नाही. ते जगातील सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आमच्या सरकारच्या प्रयत्नाने साकारणार असून स्वतः पंतप्रधान या स्मारकाच्या भूमीपूजनाला आले होते याची आठवण त्यांनी करून दिली. महाराज ही उपाधी या दोन्ही विमानतळाच्या नामकरणात निर्देशित करण्यासाठी एक शिवप्रेमी म्हणून आपण स्वतः पंतप्रधानांची लवकर भेट घेणार असून ते आपल्याला निश्चित न्याय देतील असा विश्वास खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला याविषयी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री यांना पाठवलेले पत्र आणि त्याला केंद्रीय उड्डाण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराची कागदपत्रेच लोकमतच्या सदर प्रतिनिधिकडे पाठवली आहेत.त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी 8 मे 2017 रोजी आपण केंद्रीय हवाई मंत्री पी.अशोक गणपती राजू यांना पत्र देऊन महाराज ही उपाधी या दोन्ही विमानतळाच्या नावात लवकर निर्देशित करण्याची आग्रही मागणी केली होती. आपल्या पत्राला मंत्री महोदयांनी 24 मे 2017 रोजी लेखी उत्तर देऊन ही बाब तपासून आपण ठोस कार्यवाही करू असे आश्वासन दिले होते.मात्र एक वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी चार अक्षरी पण अत्यंत महत्त्वाचा महाराज हा शब्द केंद्रीय हवाई मंत्रालयाने टाकला नसल्याबद्धल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

महाराज ही उपाधी निर्देशित करण्यासाठी वॉच डॉग फाउंडेशनचे विश्वस्त अॅड.ग्राडफे पिमेटा व निकोलस अल्मेडा 1990 पासून लढा देत असून लोकमतने देखील हा विषय सातत्याने मांडला आहे. जर येत्या 8 दिवसात या दोन्ही विमानतळांच्या नावात महाराज ही उपाधी लागली नाही तर वॉच डॉग फाउंडेशन व आमचे सहार गावातील शिवप्रेमी सहार विमानतळाच्या बाहेर आमरण उपोषणाला बसतील असा इशारा पिमेटा व अल्मेडा यांनी दिला आहे.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजगोपाळ शेट्टीनरेंद्र मोदी