पालिकेचा मोर्चा आवाजाकडे
By Admin | Updated: January 28, 2015 01:35 IST2015-01-28T01:35:42+5:302015-01-28T01:35:42+5:30
कानठळ्या बसेपर्यंत वाजणारे कर्णकर्कश हॉर्न आणि सतराशेसाठ सणानिमित्त सुरू असलेल्या लाऊडस्पीकरच्या गोंगाटामुळे मुंबईकरांना बहिरेपण येण्याची वेळ आली

पालिकेचा मोर्चा आवाजाकडे
मुंबई : कानठळ्या बसेपर्यंत वाजणारे कर्णकर्कश हॉर्न आणि सतराशेसाठ सणानिमित्त सुरू असलेल्या लाऊडस्पीकरच्या गोंगाटामुळे मुंबईकरांना बहिरेपण येण्याची वेळ आली आहे़ त्यामुळे वेळीच पावले उचलून ध्वनिप्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे़ त्यानुसार मुंबईतील १२०० ठिकाणांचा अभ्यास करून तेथील आवाजाची पातळी कमी करण्याबाबत उपाय सुचविण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे़
मुंबईत वर्षागणिक वाहनांची संख्या वाढत असल्याने ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढली आहे़ त्याचबरोबर उद्योगधंदे, कायमस्वरूपी लावण्यात आलेले लाऊडस्पीकर, खेळाची मैदाने, क्रीडांगणे, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रेल्वे स्थानके याबरोबरच विविध सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या गोंगाटामुळे मुंबईत ध्वनिप्रदूषणाची मात्रा वाढली आहे़ या गोंगाटाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाने निश्चित केलेल्या मानकाची पातळीही ओलांडली आहे़
याबाबत २०११ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले होते़ त्यानुसार मुंबईतील १२०० ठिकाणे शोधून तेथील आवाजाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे़ ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने घेतलेला पुढाकार हा अशा प्रकरचा पहिलाच प्रयत्न आहे़ वर्षभरात हा अहवाल तयार होईल़ या कामासाठी सल्लागार कंपनीला ७७ लाख रुपये मोबदला देण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)