Join us  

दिवसाला होतेय १०० हून अधिक जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 4:46 PM

१६६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करत, १३८ जणांवर अटकेची कारवाई.

मुंबई :  संचारबंदीत आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिवसाला १०० जणांवर कारवाई होत आहे. शुक्रवारी मुंबईत १६६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करत, १३८ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपायांबाबतच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी  मुंबई पोलिसांनी २० मार्च ते ३ एप्रिल पर्यंत केलेल्या कारवाईत मुंबईत ८८८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात १६९२ जणांना आरोपी दाखवत १३३२ जणांना अटक करून त्यांना जामिनावर सोडून देण्यात आले आहे. तर २४६ आरोपींना नोटीस देवून सोडण्यात आले असून ११४ आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. कोरोनाचे संशयिताविरुद्ध ४  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर , हॉटेल आस्थापना २५, पान टपरी १६, इतर दुकाने ५८, हॉकर्स/ फेरीवाले २३, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी ४५० तर अवैध वाहतूक प्रकरणी ३१२ गुन्हे नोंदविन्यात आले आहेत. नागरिकांना अजूनही घराबाहेर जावू नये याबाबत बजावून देखील मुंबईकर गर्दी करताना दिसत आहेत. अशात पोलिसांकड़ून नागरिकांची धरपकड़ करत त्यांची वाहनेही जप्त करण्यात येत आहे.

तसेच विविध बाजार, भाजी मंडई मैदानात हलविन्यात आल्या आहेत. अशात नागरिक या मैदानात गर्दी करताना दिसत आहेत. शनिवारी सकाळी बीकेसी एमएमआरडीए येथील मैदानातही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पहावयास मिळाली. मुंबई पोलिसांकड़ून शक्य तसे प्रयत्न करण्यात येत असतानाही काही मुंबईकर त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ३०६ वर पोहचली आहे. दिवसाला वाढणाऱ्या आकडयामुळे मुंबईवरील धोका वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरी राहून सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.

टॅग्स :गुन्हेगारीकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस