Join us

Monsoon: खबरबात पावसाची; तर मान्सून कुठे लवकर येईल...!  

By सचिन लुंगसे | Updated: May 25, 2024 21:27 IST

Monsoon Update News: मान्सून प्रगतीपथावर असुन निम्मे बंगाल उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भुभाग दोन मान्सूनने हिश्याने काबीज केला आहे. मान्सूनचे आगमन ३१ मे दरम्यान केरळात तर १० जून दरम्यान मुंबईसह कोकणात होण्याची शक्यता आहे.

मुंबई - मान्सून प्रगतीपथावर असुन निम्मे बंगाल उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भुभाग दोन मान्सूनने हिश्याने काबीज केला आहे. मान्सूनचे आगमन ३१ मे दरम्यान केरळात तर १० जून दरम्यान मुंबईसह कोकणात तर १५ जून दरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भात होवु शकते. दरम्यान, मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकर सक्रिय होवु शकते. तसे झाल्यास सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व लगतच्या जिल्ह्यात, मध्य महाराष्ट्र व खान्देशपेक्षा मान्सूनचे आगमन तेथे अगोदर होवु शकते. जूनच्या पहिल्या आठवड्यातील  मान्सूनच्या घडामोडीवर हे सर्व अवलंबून आहे.

विदर्भ, मराठवाड्यात ३० मे पर्यंत अवकाळीचे वातावरण निवळून उष्णतेची लाट सदृश्य स्थिती कायम राहील. कोकणसह खान्देश, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात अवकाळीच्या स्थितीबरोबरच १ जूनपर्यंत उष्णता सदृश्य स्थिती कायम राहील. कोकण वगळता महाराष्ट्रात सध्याचे दुपारचे कमाल तापमान ४० ते ४४ तर पहाटेचे किमान तापमान २८ ते ३० अंश आहे. महाराष्ट्रात मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीचा उकाडाही अधिक जाणवेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. दुसरीकडे  बंगाल उपसागरात तयार झालेले अतितीव्र स्वरूपातील रेमल नावाचे चक्रीवादळ २६ मे रोजी मध्यरात्री ताशी १३० ते १३५ किमी वेगाने बांगलादेश किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. वादळासाठी ओमानने नाव सुचविले असुन अरेबिक भाषेतील त्याचा अर्थ वाळू किंवा रेती होय. मान्सून वाटचालीवर तसेच महाराष्ट्रात सुरु असलेल्या उष्णता लाट सदृश्य स्थितीवर त्याचा विपरीत परिणाम जाणवणार नाही.

टॅग्स :मुंबईपाऊस