Join us  

मुंबईसह कोकणात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 9:50 AM

मुंबईत आणि उपनगरांत आज मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

मुंबई- मुंबईत आणि उपनगरांत आज मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. शनिवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, रायगड, ठाणे, नवी मुंबईकरांचे मेघाहाल झाले. शनिवारी पहाटेपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी पावसाने आपला मारा कायम ठेवला. शनिवारी सकाळी मात्र मुंबईत पावसाचा वेग किंचित कमी झाला. सकाळच्या वेळी अगदी तुरळक ठिकाणी रिमझिम कोसळत असलेला पाऊस शनिवारी दुपारी चांगलाच बरसला.उपनगरात ढगांनी केलेल्या काळोखामुळे नागरिकांना पुन्हा धडकी भरली. पूर्व उपनगरात पाऊस घेऊन आलेले हे ढग मनमुराद कोसळले. सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, साकिनाका, भांडुप, अंधेरी, गोरेगाव आणि बोरीवली परिसरात पावसाच्या अधूनमधून मुसळधार सरी कोसळत आहेत. दरम्यान, आज 28 जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या चार जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

  • उत्तर, दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

उत्तर आणि दक्षिण कोकणात 28, 29, 30 आणि 31 जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि रायगडसह मुंबई जिल्ह्यांना पावसाचा फटका बसेल.उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात 28, 29, 30, 31 जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांनाही पावसाचा काहीसा फटका बसेल, अशी शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.

  • विमान वाहतुकीचा खोळंबा

मुसळधार पाऊस व खराब हवामानामुळे विमानांच्या वाहतुकीला सरासरी तासभर विलंब झाला. मुंबई विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या 353 विमानांना (78 टक्के ) सरासरी अर्धा तास विलंब झाला. 17 विमानांचा मार्ग वळवला. मुंबईत उतरणा-या विमानांपैकी 188 विमानांना (42 टक्के) सरासरी 25 मिनिटांचा विलंब झाला. पावसामुळे टर्मिनल 2 मध्येदेखील पाणीगळती होत होती. अनेक प्रवासी विमानात, विमानतळावर अडकून पडले होते. काही विमान कंपन्यांनी प्रवाशांना खाण्या-पिण्याची सुविधा पुरवली नसल्याने प्रवाशांमधून त्रागा केला जात होता.

टॅग्स :पाऊस