मोदी लाटेत शेकापची गणिते कोलमडली
By Admin | Updated: May 17, 2014 00:21 IST2014-05-17T00:21:43+5:302014-05-17T00:21:43+5:30
मावळ लोकसभा मतदारसंघात खरी लढत शेकाप-शिवसेनेत झाली.

मोदी लाटेत शेकापची गणिते कोलमडली
प्रशांत शेडगे, पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघात खरी लढत शेकाप-शिवसेनेत झाली. या निवडणुकीत महायुतीशी फारकत घेऊन शेकापने उमेदवार उभा करून जी वेगळी गणिते मांडली होती ती मोदी लाटेसमोर कोलमडून गेल्याने सेनेचे श्रीरंग बारणे दीड लाखांच्या फरकाने निवडून आले. या निकालाचा परिणाम काही प्रमाणात आगामी विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. मागील वेळी शिवसेनेच्या वतीने गजानन बाबर आणि राष्ट्रवादीकडून आझम पानसरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने उमेदवार उभा न करता शिवसेनेला पाठिंबा दिला. याच बळावर बाबर हे सुमारे ८० हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले. बाबर यांनी घाटमाथ्यावरच जादा लक्ष दिले. पनवेल, उरण, कर्जत आणि खालापूरकडे हे फिरकले नाहीत किंवा एखादे ठोस कामही बाबर यांच्या काळात झाले नाही. मत मागण्यासाठी आलेले बाबर मतदारांच्या नजरेस पडले नाहीत. या भागातून यावेळी गजानन बाबर यांच्या नावाला प्रचंड विरोध झाला म्हणून सेनेने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आणि बाबर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. वास्तवित पाहता मागील विधानसभा निवडणुकीत बारणे लक्ष्मण जगताप यांच्याकडून पराभूत झाले होते. जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार होते. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र पिंपरी, चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे कायम केली नाहीत म्हणून त्यांनी उमेदवारी नाकारली. शेकापचे नेते जयंत पाटील यांनी ही संधी साधत जगताप यांच्या खांद्यावर लालबावटा टाकत त्यांना पक्षाची उमेदवारी दिली. बळीचा बकरा होऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून कोणीही उमेदवारी घेण्यासाठी पुढे आले नाहीत. त्यामुळे घड्याळाने सेनेचे राहुल नार्वेकर यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. या दोनही उमेदवारांपेक्षा लक्ष्मण जगताप हे तुल्यबळ होते. त्यांच्या पाठीमागे पिंपरी - चिंचवडमधील बेपरवाना घरे असलेले रहिवासी उभे राहतील. त्याचबरोबर राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा आणि घाटाखाली शेतकरी कामगार पक्षाची मदत, तसेच राज ठाकरे यांनी जाहीर केलेला पाठिंबा या सर्व गोष्टी त्यांच्याकरिता जमेच्या होत्या. या उलट बारणे यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. गजानन बाबर यांनी केलेला जय महाराष्ट्र, मागील निवडणुकीप्रमाणे लालबावट्याची साथ नसल्याने ते एकाकी पडल्यासारखे वाटत होते. मात्र शेतकरी कामगार पक्ष आणि लक्ष्मण जगताप यांनी बांधलेले सर्वच आडाखे चुकले. अनधिकृत घरांचा वादग्रस्त मुद्दा, मनसेचा प्रभावहीन पाठिंबा, पनवेल परिसरात राज ठाकरे यांचे भाषण न होणे यासारख्या अनेक गोष्टी जगतापांसाठी उणे ठरल्या. या उलट श्रीरंग बारणे यांच्याकरिता उध्दव ठाकरे यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होती.