मोदी लाटेत आघाडीची धूळधाण
By Admin | Updated: May 17, 2014 02:18 IST2014-05-17T02:18:34+5:302014-05-17T02:18:34+5:30
आघाडीच्या दिग्गज उमेदवारांना एका फटक्यात गारद करीत महायुतीच्या उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत इतिहास घडविला आहे.

मोदी लाटेत आघाडीची धूळधाण
मुंबई : आघाडीच्या दिग्गज उमेदवारांना एका फटक्यात गारद करीत महायुतीच्या उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत इतिहास घडविला आहे. महायुतीच्या विजयामागे ‘मोदी फॅक्टर’ असल्याचे म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात या फॅक्टरसोबतच पाच वर्षांत येथील खासदारांनी नागरिकांना अपेक्षित असलेली कामे न केल्याने झालेल्या मतांतराचा फटका आघाडीच्या दिग्गज उमेदवारांना बसला. दक्षिण मुंबईत आघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा यांचे वर्चस्व असल्याने साहजिकच त्यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात होते. मात्र उच्चभ्रू वस्तीत त्यांनी केलेला प्रचारही त्यांच्या कामी आला नाही. मनसे उमेदवार बाळा नांदगावकर आणि महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांनी यांच्या भांडणात देवरांचा विजय होईल, अशी अटकळ होती. शिवाय आपसारखा फॅक्टर येथे महायुती आणि मनसेला नडेल, अशीही भीती होती. मात्र सावंत यांनी येथील गल्ल्याबोळं पिंजून काढली. म्हणून भायखळा आणि मुंबादेवी वगळता उर्वरित वरळी, शिवडी, मलबार हिल आणि कुलाबा विधानसभा क्षेत्रावर महायुतीने वर्चस्व मिळवले. परिणामी सावंत यांनी पावणेचार लाख मतांपर्यंत मजल मारली. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्यावर मतदार नाराज होते. ती नाराजी मतदानातून व्यक्त झाली. शिवाय मनसे उमेदवार आदित्य शिरोडकर हे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची मते घेतील. त्यामुळे एकनाथ गायकवाड यांचा विजय होईल, असा अंदाज बांधण्यात आला होता. प्रत्यक्षात आदित्य प्रचार आणि प्रसारात कमी पडले. महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीचे मुद्दे त्यांना हाताळता आले नाहीत. याच वेळी राहुल शेवाळे यांनी चेंबूर, अणुशक्तीनगर, माहीम, धारावी, सायन-कोळीवाडा आणि वडाळा या सहाही विधानसभा मतदारसंघांतील मतदारांना आकर्षित केले. त्यामुळेच ते ३ लाख ८१ हजार मते मिळवत एकनाथ गायकवाड यांना धूळ चारू शकले. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात आघाडीच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र पक्षांतर्गत वादाचा फटका प्रिया यांना बसला. शिवाय सपाचे उमेदवार फरहान आझमी हे काही विशेष धडपड करू शकले नाहीत. ‘आप’च्या फिरोज पालखीवाला यांनी मतदारांना आपल्याकडे वळविले आणि त्याचा काहीसा फटका प्रिया यांना बसला. शिवाय बसपाचे आनंद शिंदे हा उमेदवारही इथला काहीसा ‘की फॅक्टर’ ठरला. महत्त्वाचे म्हणजे काँगे्रसच्या या बालेकिल्लातील विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, वांद्रे पूर्व आणि पश्चिम, कलिना या सहाही विधानसभा मतदारसंघांवर महायुतीने कब्जा केला. परिणामी पूनम महाजन यांना तब्बल ४ लाख ७८ हजार ५३५ मते मिळाली. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी येथे अक्षरश: किमया केली. मनसेचे उमेदवार महेश मांजरेकर या लढाईत दूरच्या दूर फेकले गेले. आपचे मयांक गांधी फारशी काही करामत करू शकले नाहीत. याचदरम्यान महायुतीने दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम आणि जोगेश्वरी या सहाही विधानसभा मतदारसंघांवर वर्चस्व प्रस्थापित केले. परिणामी ४ लाख ६४ हजार ८२० मते मिळवित कीर्तिकर यांनी कामत यांना धूळ चारली. उत्तर मुंबई मतदारसंघात आघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांनाही विजयाची खात्री होती. मात्र महायुतीने गोपाळ शेट्टी यांच्यासारखा दिग्गज उमेदवार देत आघाडीला चारही मुंड्या चीत केले. बोरीवली, दहिसर, चारकोप, मागाठाणे, मालाड आणि कांदिवली या सहाही विधानसभा मतदारसंघांवर महायुतीने पक्कड मजबूत केली. शिवाय आपचे सतीश जैन आणि सपाचे कमलेश यादव यांच्यासारखे उमेदवार संजय निरुपम यांना नडले. परिणामी शेट्टी यांनी ६ लाख ६४ हजार ००४ मते घेत आघाडीला पराभूत केले. उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचाही विजय निश्चित मानला जात होता. दरम्यान, आपने येथे मेधा पाटकर यांना येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले, तर महायुतीने किरीट सोमय्या यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. मेधा पाटकर यांनी प्रचार आणि प्रसारादरम्यान जोर लावल्याने संजय दिना पाटील आणि किरीट सोमय्या यांचे धाबे दणाणले. भाजपाचे पक्षांतर्गत राजकारण सुरू झाले. मात्र ते समोर आले नसले तरी त्याची चर्चा झाली. शिवाय येथील मुलुंड, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व या विधानसभा मतदारसंघांवर महायुतीने पकड मिळवली. परिणामी संजय दिना पाटील यांच्याऐवजी किरीट सोमय्या यांचे पारडे जड झाले. ोधा पाटकर येथून विजयी होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र सरतेशेवटी इथला तळागाळातला फॅक्टर महायुतीच्या कामी आला आणि सोमय्या विजयी झाले. (प्रतिनिधी)