Join us  

"आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक लढवय्या आहे; बचेंगे तो और भी लढेंगे"

By मुकेश चव्हाण | Published: January 19, 2021 1:53 PM

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने लढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते

मुंबई: राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकालानंतर भाजपा नंबर एकचा पक्ष ठरल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीनेच बाजी मारल्याचा दावाही करण्यात येत आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या या संपूर्ण निकालात मनसेनेही स्वत:कडे लक्ष वेधून घेतलं आहे.

मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने लढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानुसार मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीत ताकद लावल्याचं दिसतंय. कारण मनवसेने मुंबईजवळची ग्रामपंचायत असो की तिकडे विदर्भ, आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे.  ग्रामपंचायतीच्या या यशानंतर मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी ''बचेंगे तो और लढेंगे'', असं म्हणत विजयी झालेल्या मनसेपुरस्कृत उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. 

बाळा नांदगांवकर फेसबुकद्वारे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काल आलेत. खरे तर ग्रामपंचायत ही सहसा पक्षपातळीवर न लढता स्थानिक पॅनेलद्वारे लढली जाते. सोमवारी निकाल आल्यापासून सर्व जण मोठ्या यशाचे व इतर हि अनेक दावे करत आहेत. आपण या कोणत्याच भानगडीत न पडता पुढे जाऊया. आपल्या पक्षाला मिळालेले यश हे निश्चितच आशादायक आहे.पक्षाच्या सर्व विजयी उमेदवारांचे तसेच प्रत्यक्षात मैदानात उतरून लढा दिलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे व राज्यातील सर्व जनतेचेही मनापासून आभार व हार्दिक अभिनंदन, असं बाळा नांदगांवकर यांनी म्हटलं आहे. 

बचेंगे तो और भी लढेंगे

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काल आलेत. खरे तर ग्रामपंचायत हि सहसा पक्षपातळीवर...

Posted by Bala Nandgaonkar on Monday, 18 January 2021

तत्पूर्वी, मनसेने एकट्या यवतमाळमध्ये १५ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. बुलढाण्यात जिगाव ग्रामपंचायतीवर असलेली शिवसेनेची २५ वर्षाची सत्ता उलथवून मनसेने विजय पटकावला आहे. जिगाव ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात आली आहे. याठिकाणी ९ पैकी ७ जागांवर मनसेने विजय मिळवला आहे. उस्मानाबादमध्ये जळकोटमध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनीही विजय मिळवला आहे. औरंगाबादच्या रेणापूरमध्ये मनसेने ७ पैकी ६ जागा जिंकल्या आहेत.  रायगडच्या जोहे येथे मनसेचा १ उमेदवार जिंकला आहे. जुन्नरच्या खिल्लारवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने झेंडा फडकवला आहे. अजूनही राज्यात ठिकठिकाणी मनसेप्रणित आघाडीचे उमेदवार जिंकल्याची माहिती आहे.

अमरावतीतील अचलपूर तालुक्यात खैरी सावंगी वाढोवा ग्रामपंचायतीत मनसेचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आले आहेत. रत्नागिरीच्या नवशी ग्रामपंचायतीत मनसेने खाते उघडले आहे. बीडच्या केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने वर्चस्व मिळवलं आहे, याठिकाणी ७ पैकी ५ जागांवर मनसेच्या सदस्यांचा विजय झाला आहे.

शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही- देवेंद्र फडणवीस

"राज्यात गावागावांमध्ये काही आम्ही प्रचाराला जात नाही. तेथील स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेच मेहनत घेत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाराष्ट्रात काही भागात वर्चस्व आहे. शिवसेना हा काही महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही. पण भाजपचं असं नाही. भाजप संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आम्हाला तिन्ही पक्षांच्या विरोधात यावेळी लढावं लागलं. त्यामुळे आम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रात स्पेस आहे", असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

शहरांपासून गावांमधील जनतेचाही महाविकास आघाडीवर विश्वास- आदित्य ठाकरे

ग्रामपंचायतीच्या निकालांवर मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झाला, असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच शहरांपासून गावांपर्यंत लोकांचा या सरकारवर विश्वास आहे. कोराना काळात सरकारने परिस्थिती कशी हाताळली आहे, हे लोकांनी बघितलं आहे. पर्यावरणाचा समतोल राखत विकास करत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :बाळा नांदगावकरमनसेराज ठाकरेग्राम पंचायतनिवडणूक