Join us  

“बाळासाहेबांनाही अश्रू आवरले नसावेत, छत्रपतींच्या वंशजाला...”; मनसेची शिवसेनेवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 1:45 PM

छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणे वेदनादायक होते, असे सांगत मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुंबई: राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) निवडणुकीत वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे शिवसेनेत प्रवेश केला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला. घोडेबाजार होऊ नये म्हणून निवडणूक लढवणार नाही. ही माघार नसून, स्वाभिमान आहे, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत, ते दिलेला शब्द मोडणार नाहीत, असे सांगत शिवसेनेने संभाजीराजेंवर पलटवार केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने शिवसेनेवर टीका केली आहे. 

मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणे वेदनादायक होते. उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात "शिव" वापरायची लायकी नाही असेच म्हणावे लागेल. आदरणीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत, अशी घणाघाती टीका गजानन काळे यांनी केले आहे. 

राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती मग शिवसेनेचा द्वेष का?

राज्यसभेवर शिवसेनेचे २ खासदार जावेत यासाठी पक्षप्रमुखांनी विचार केला. शिवसेनेसाठी ज्यांनी आयुष्य वेचले त्यांना संधी द्यावी असे ठरवले. अशावेळी छत्रपती संभाजीराजेंचा विषय आला. उदार अंतःकरणाने शिवसेनेने संभाजीराजे यांना पक्षात प्रवेश करा, खासदारकी घ्या अशी ऑफर दिली. तुम्ही तुमच्या विचारांशी ठाम आहे, तर शिवसेनाही आपल्या विचारांशी ठाम आहे. तुम्ही राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती मग शिवसेनेचा द्वेष का? असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते खासदार अरविंद सावंत यांनी विचारला आहे. साताऱ्याचीही गादी आहे. ते कधी राष्ट्रवादीत, कधी भाजपत असतात. प्रबोधनकार आणि शाहू महाराजांचे चांगले संबंध होते. शिवसैनिकांना डावलून राजे शिवसेनेत येत असतील तर त्यांना उमेदवारी देण्याचा विचार केला. तुम्हाला समाजाचे काम करायचे होते कुणी अडवले होते, अशी विचारणा सावंत यांनी केली.

दरम्यान, शिवसेनेत प्रवेश करा तुम्हाला खासदार करू असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. परंतु, मी प्रवेश करणार नाही स्पष्ट सांगितले. माझी उमेदवारी ही घोडेबाजारासाठी नव्हती. सगळ्या पक्षातील लोकांनी मला मदत करावी. निष्कलंक माझे व्यक्तिमत्व आहे. मला कुठल्याही पक्षाचा द्वेष नाही. मला सगळी गणिती माहिती होती. पुढचा प्रवास खडतर होता याची जाणीव होती. मला शिवसेना खासदारांचे फोन आले. सगळ्या अपक्ष आमदारांवर दबाव होता. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला असा गौप्यस्फोट संभाजीराजे यांनी केला.  

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीशिवसेनामनसेराज्यसभा