लव्ह ट्रँगलमुळे मित्राची हत्या;रेल्वे पोलिसांनी ४८ तासांत ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 19:45 IST2018-10-26T23:39:51+5:302018-10-27T19:45:12+5:30
प्रेयसीसोबत फिरत असल्याच्या कारणामुळे मित्राची हत्या करणाऱ्या ७ आरोपींना ४८ तासांत बेड्या ठोकण्यात रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील विशेष कृती दलाला यश आले आहे

लव्ह ट्रँगलमुळे मित्राची हत्या;रेल्वे पोलिसांनी ४८ तासांत ठोकल्या बेड्या
मुंबई - प्रेयसीसोबत फिरत असल्याच्या कारणामुळे मित्राची हत्या करणाऱ्या ७ आरोपींना ४८ तासांत बेड्या ठोकण्यात रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील विशेष कृती दलाला यश आले आहे. मंगेश सरजिने असे या प्रकरणातील प्रमुख आरोपीचे नाव आहे. या हत्येत सहभागी असलेल्या अन्य ६ जणांनादेखील रेल्वे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
रोमा (नावात बदल) माझी प्रेयसी असूनदेखील मैजुफूल तिच्या सोबत फिरत होता. याचा जाब विचारला असता मैजुफूलने मला बांबूने मारहाण केली होती. या गोष्टीचा राग मनात धरून बदला घेण्यासाठी मंगळवारी रात्री ११च्या सुमारास रे रोड स्थानकातील फलाट क्रमांक १वरील गेटजवळ मैफुजूलला घेरले. अन्य सहा जणांच्या मदतीने मैजुफूलला मारहाण केली. या वेळी चाकूने मैजुफूलच्या छातीवर वार करत जीवे मारल्याची कबुली आरोपी मंगेश सरजिने याने दिल्याची माहिती रेल्वे पोलिसांच्या पश्चिम परिमंडळ उप-आयुक्त आणि मध्य परिमंडळ उप-आयुक्त (अतिरिक्त भार) पुरुषोत्तम कराड यांनी दिली.
मंगेशसह प्रथमेश तरपे, रोहन खेडेकर, हृतिक कदम, अभिषेक पाटील, नीलेश ओझा आणि अमित मिश्रा या सहा तरुणांनादेखील गजाआड केले आहे. सर्व तरुण २१ वर्षांखालील असून काळाचौकी आणि घोडपदेव परिसरात राहणारे होते. सात आरोपींनी पूर्वनियोजन करत हा गुन्हा केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. रे रोडवर मंगळवारी रात्री घडलेल्या खुनाचा तपास करताना स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज पाहण्यात आले. त्यातून हृतिक कदमचे छायाचित्र काढून सूत्रांच्या मदतीने कदमला घोडपदेव येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली.