मुरबाडमधील तीन गावांचे स्थलांतर
By Admin | Updated: August 12, 2014 00:25 IST2014-08-11T23:31:39+5:302014-08-12T00:25:21+5:30
मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, बोरवाडी, धानकी व आंबेगाव तालुक्यातील साखरमाची या आदिवासी लोकवस्ती असलेल्या गावांच्या शेजारी डोंगर खचल्याने माळीण पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

मुरबाडमधील तीन गावांचे स्थलांतर
सुधाकर वाघ, धसई
मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, बोरवाडी, धानकी व आंबेगाव तालुक्यातील साखरमाची या आदिवासी लोकवस्ती असलेल्या गावांच्या शेजारी डोंगर खचल्याने माळीण पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या तीनही गावांतील लोकांना मुरबाड तालुक्यातील डोंगरपायथ्याशी हलविण्यात आले आहे.
ठाणे व पुणे जिल्ह्याच्या सीमारेषा ठरलेल्या सह्याद्री पर्वतरांगेतील भिमाशंकर अभयारण्यातील मुरबाडचे साखरमाची सिद्धगड, धानकी हे आदिवासी समाजाचे गाव आहे. आंबेगाव तालुक्यातील माळीण पासून ३५-४९ कि.मी. अंतरावरील साखरमाचीलगतच्या डोंगराला व जमिनीला तडे गेल्यामुळे धोकादायक बनले आहे, तर २६ जुलै २०१२ रोजी सिद्धगड गावाजवळील जमीन खचल्यामुळे गावातील लोकांना डोंगर पायथ्याजवळील ऐनाचीवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले होते. सिद्धगड गावात मागील वर्षी २६ कुटुंबांतून २५३ लोकसंख्या होती. त्यापैकी ९ कुटुंबे डोंगर पायथ्याशी असलेल्या ऐनाचीवाडी या आदिवासी वाडीत विस्थापित झाली आहेत. तर १६-१७ कुटुंबे अजूनही सिद्धगडावर वास्तव्यात आहेत. यंदाच्या पावसाळ्यात सिद्धगडावर दरडी कोसळल्याने घाबरून गावातील ८ ते १० कुटुंबांनी आपली घरे सोडून ऐनाचीवाडी येथे आसरा घेतला आहे़ मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, धानकी, बोरवाडी व माळशेज घाट परिसरातील कित्येक वाड्यांनाही भूस्खलनाचा धोका असल्याने लवकरच त्यांचे विस्थापन झाले नाही तर माळीणची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही.