एमएमआर क्षेत्रात मेट्रोची सेवा
By Admin | Updated: June 18, 2016 04:50 IST2016-06-18T04:50:55+5:302016-06-18T04:50:55+5:30
मेट्राचे जाळे केवळ मुंबई पुरते मर्यादित राहणार नाही. एमएमआरडीए परिक्षेत्रातील शहरे मेट्रोने जोडली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. त्यात प्रामुख्याने

एमएमआर क्षेत्रात मेट्रोची सेवा
कल्याण : मेट्राचे जाळे केवळ मुंबई पुरते मर्यादित राहणार नाही. एमएमआरडीए परिक्षेत्रातील शहरे मेट्रोने जोडली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. त्यात प्रामुख्याने ठाणे, भिवंडी, कल्याण डोंबिवली ही शहरे प्रथम जोडली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कल्याण पश्चिमचे भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी दीड वर्षात केलेल्या विकासकामांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी नवरंग सभागृहात झाले. यावेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, भाजप नेते जगन्नाथ पाटील, आमदार नरेंद्र पवार, रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड, किसन कथोरे आदी मान्यवर उसस्थित होते.
एमएमआरडीएने केवळ मुंबई पुरताच विचार करून नये. एमएमआरडीए क्षेत्रातील शहरांच्या विकासावर लक्ष द्यावे. यासाठी भाजपा सरकार लक्ष देणार आहे. मेट्रो मुंबई पुरती मर्यादित न ठेवता इतर शहरे जोडण्याचे काम केले जाईल. तिचा विस्तार करण्यात येईल. एमएमआर रिजनमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी एकात्मिक वाहतूक विकासआराखडा तयार करण्याचे काम पहिल्या प्रयत्नात सुरू आहे.
कोणत्याही ठिकाणाहून व्यक्तीने प्रवास सुरू केला तर ती व्यक्ती त्याच्या इच्छीत स्थळी एका तासात पोहचली पाहिजे हा, वाहतूक विकासाचा दुसरा टप्पा आहे. दुसरा टप्पा हा जरा लवकर न होणारा आहे. त्याला वेळ लागू शकतो. मात्र पहिला टप्पा हा मेट्रो, रेल्वे आणि बस यांचे एकच तिकीट असावे. एकाच तिकीटात सगळा प्रवास करता यावा. ते तिकीटही मोबाइल अॅप्स द्वारे मिळावे. वेळेत, योग्य किमतीत सेवा दिली जावी. हे लवकरात लवकर पूर्ण करणे शक्य आहे.
आयटी बॅक बोन इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यात भिवंडी-कल्याण-शीळ हा एलिव्हेटेड रस्ता तयार करण्यात येणार आहे. तसेच भिवंडी- कल्याणला जोडणारा दुर्गाडी खाडी पुलाला समांतर आणखी एक समांतर सहा पदरी पूल उभारला जाणार आहे. काहीचे काम निविदा प्रक्रियेत आहेत. तर काहीच्या निविदा काढून झालेल्या आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
साडेचार कोटी नागरिकांना रोजगार :
भाजपा सरकार जे आश्वासन देते, त्याची पूर्तता करते. सत्तेवर येण्यापूर्वी देशभरात एक कोटी रोजगार देऊ, असे सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेद्वारे पहिल्याच वर्षात साडेचार कोटी नागरिकांना रोजगार दिला. आश्वासन चार पटीत पूर्ण केले आहे.
नरेंद्र पवारांकडून चांगली कामे : आमचा प्रत्येक आमदार, खासदार, नगरसेवक हा नागरिकांना दिलेल्या शब्दाला उत्तरदायी आहे. तेच उत्तरदायित्व आमदार नरेंद्र पवार यांनी पूर्ण केले आहे. दीड वर्षात त्यांनी चांगले प्रश्न हातळले आहेत, अशा शब्दांत फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांना आमदार रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड, किसन कथोरे यांच्या सहकार्याची साथ मिळत असल्याचे नमूद केले.