मेट्रो रेल्वेमुळे महानगरी सुसाट!

By Admin | Updated: June 8, 2015 03:29 IST2015-06-08T03:29:43+5:302015-06-08T03:29:43+5:30

मेट्रोचा ८ जून (सोमवार) रोजी पहिला वाढदिवस साजरा होत आहे. आणि याच निमित्ताने ‘लोकमत’ टीमने वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोसह भविष्यातील मेट्रो प्रकल्पांचा घेतलेला लेखाजोखा.

Metro rail due to Metro rail! | मेट्रो रेल्वेमुळे महानगरी सुसाट!

मेट्रो रेल्वेमुळे महानगरी सुसाट!

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर वर्षभरापूर्वी धावू लागलेल्या मेट्रोने प्रवाशांच्या वेळेची गणितेच बदलली. मेट्रोने पूर्व आणि पश्चिम उपनगरे जोडल्याने प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटकाही झाली. मेट्रोच्या भाड्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लावली असली, तरीही उत्तम सुविधा मिळाल्याने प्रवाशांनी मेट्रोलाच पसंती दिली. अशाच काहीशा देखण्या मेट्रोचा ८ जून (सोमवार) रोजी पहिला वाढदिवस साजरा होत आहे. आणि याच निमित्ताने ‘लोकमत’ टीमने वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोसह भविष्यातील मेट्रो प्रकल्पांचा घेतलेला लेखाजोखा.
-----------
मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्यावहिल्या मेट्रोने प्रवाशांना दिलासा दिला असतानाच आता भविष्यात सुरू होणाऱ्या दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो आणि अंधेरी-दहिसर मेट्रोचे हे प्रकल्प प्रवाशांना आणखी दिलासा देणार आहेत. नव्या मेट्रो प्रकल्पांमुळे प्रवाशांची वेळ तर वाचणारच आहे; शिवाय त्यांची वाहतूककोंडीतूनदेखील सुटका होणार आहे.
मेट्रो-२ हा दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्दचा अहवाल तयार झाला आहे. या अहवालाला एमएमआरडीएने २० नोव्हेंबर २०१४ ला मंजुरी दिली असून, हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्वत: उभारणार आहे. या प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगर जोडले जाणार आहे. विशेषत: हार्बर मार्गावरील मानखुर्द हे ठिकाण वेस्टर्न मार्गावरील दहिसर ठिकाणाला जोडले जाणार असल्याने प्रवास अधिक सुखकर होणार आहे. मेट्रो-३ या कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी प्रकल्पाचे काम २०१६ साली सुरू होणार आहे. हा प्रकल्प २०२० साली पूर्ण केला जाणार आहे. विशेष म्हणजे या मेट्रो मार्गामुळे कफ परेड ते विमानतळ ते अंतर अवघ्या ५० मिनिटांत पार करता येणार आहे. या मार्गावरील मेट्रोचे किमान भाडे ११ तर कमाल भाडे ३६ रुपये असणार आहे. हा प्रकल्प मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे राबविण्यात येणार असल्याने दराचा भुर्दंड प्रवाशांवर टाकला जाणार नाही. मेट्रो-५ हा अंधेरी ते दहिसर प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्वत: राबविणार आहे. अंधेरी ते दहिसर या मार्गावर मेट्रो-५ उभारण्यात येणार असून, त्यामुळे हे अंतर अवघ्या ३० मिनिटांत कापता येणार आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरून ही मेट्रो धावणार आहे. १८ किलोमीटरचा हा मार्ग पूर्णत: उन्नत असणार असून, प्रकल्पाचा अंदाजित खर्च १ हजार ८०० कोटी रुपये आहे. एकंदर दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो आणि अंधेरी-दहिसर मेट्रो हे भविष्यात सुरु होणारे प्रकल्प आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला वाहतूकीच्या दृष्टीने बळकट करणार असून, जागतिक स्तरावर शहराचा दर्जा आणखी उंचावणार आहेत.

दीड तासाचा प्रवास २१ मिनिटांत !
पूर्व आणि पश्चिम उपनगरांत रिक्षांचे वर्चस्व असले तरी ऐन वाहतूककोंडीदरम्यान मुंबईकर प्रवाशांचा वेळ वाया जात होता. हा वेळ वाचविण्याचे काम मेट्रोने केले आहे. त्याला जोड म्हणून बेस्टसारखी बस प्रवाशांच्या दिमतीला आहे.
मुंबईकरांना वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विशेषत: यात भर पडलेल्या मेट्रोने प्रवाशांचा वेळ वाचविला असून, प्रवासही वेगवान झाला आहे. मध्य रेल्वेवरील प्रवाशांना अंधेरी गाठायला दादरला येण्याशिवाय पर्याय नव्हता.
कुर्ला अथवा घाटकोपरहून अंधेरीसाठी बेस्ट बस
उपलब्ध आहेत. मात्र वाहतुकीच्या कोंडीमुळे प्रवासात तब्बल एक ते दीड तास जात होता. हीच गत पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची घाटकोपरला जाताना होती. मात्र आता वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल दिमतीला आल्याने प्रवाशांना थेट घाटकोपरहून अंधेरी आणि अंधेरीहून घाटकोपर गाठणे शक्य होत आहे.

हवाई प्रवाशांना दिलासा
मेट्रो रेल्वे साकीनाका, मरोळ नाका आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना सुखद दिलासा देत आहे. या मेट्रोतून अंधेरी आणि घाटकोपरनंतर साकीनाका व विमानतळ या दोन स्थानकांवर चढउतार करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. कारण या परिसरात अनेक कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालये आहेत.

वाहतूककोंडीतून सुटका झाली
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गाहून धावू लागलेल्या मेट्रोने मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका केली असून, या मार्गावरील मेट्रोच्या अंधेरीची सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांमध्ये भर पडली आहे. अंधेरी स्थानक हे प.रे.वरील अंधेरी स्थानकाला जोडण्यात आले आहे. त्यामुळे या मेट्रो स्थानकावरील वर्दळ दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अंधेरी (पूर्व) येथील आगरकर चौकासह पश्चिम द्रुतगती मार्ग, चकाला, जे. बी. नगर, सीप्झ या ठिकाणी अनेक कॉर्पोरेट आॅफिसेस, सीप्झ, औद्योगिक वसाहती, पंचतारांकित हॉटेल्स आणि अन्य आस्थापने आहेत. या कर्मचारी वर्गाला मेट्रोने दिलासा दिला आहे.

वर्सोवा झाले पिकनिक स्पॉट
घाटकोपर व अंधेरीहून अनेक प्रवासी आता पिकनिक स्पॉटसाठी वर्सोव्याला उतरत आहेत. येथून पुढे पाच ते दहा मिनिटे चालत गेल्यावर सात बंगला चौपाटी असल्याने येथील गर्दी वाढली आहे. त्यापुढे पिकनिक कॉटेजहून समोरील अथांग समुद्राची मजा लुटण्यात मुंबईकर धन्यता मानत आहेत. शिवाय वर्सोवा स्थानकाहून रिक्षाने ५० ते ६० रुपये खर्च करून १०-१५ मिनिटांच्या अंतरावर असलेले इस्कॉन मंदिर आणि जुहू चौपाटी प्रवासी गाठत आहेत. त्यामुळे मेट्रो राइड आणि पिकनिक असे जणू काही समीकरण झाले आहे.

संकलन : सचिन लुंगसे, सुशांत मोरे

Web Title: Metro rail due to Metro rail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.