मेट्रोमुळे ‘परे’चा प्रवास सुकर
By Admin | Updated: January 8, 2015 02:16 IST2015-01-08T02:16:56+5:302015-01-08T02:16:56+5:30
मेट्रोमुळे पश्चिम रेल्वेचा प्रवास सुकर झाल्याचे समोर आले आहे.

मेट्रोमुळे ‘परे’चा प्रवास सुकर
मुंबई : मेट्रोमुळे पश्चिम रेल्वेचा प्रवास सुकर झाल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वच्या दादरपुढील डाऊन मार्गावरील स्थानकांपर्यंत प्रवास करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकातच उतरून मेट्रोचा लाभ घेत घाटकोपर स्थानक गाठत आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रत्येकी एका डब्यातील प्रवासी संख्या सरासरी २१ टक्क्यांनी कमी झाली असून, त्यामुळेच प्रवास सुकर झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
४,५०० कोटी रुपये खर्चून ८ जून रोजी घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा अशी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. मेट्रो मुंबईकरांच्या पसंतीस उतरावी, यासाठी मेट्रोचे भाडे सुरुवातीला फक्त १० रुपये ठरवण्यात आले. कुठल्याही स्थानकापर्यंतच्या प्रवासासाठी फक्त १० रुपये आकारणी केली जात असल्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरवासीयांनी मेट्रोचा पुरेपूर आनंद लुटला. महिनाभरासाठी १० रुपये आकारणी असल्याने मेट्रो प्रशासनाला याचा पुरेपूर आर्थिक फायदाही झाला. मेट्रो सुरू झाल्यावर सुरुवातीला रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २ लाख ४० हजार एवढी होती. त्यानंतरच्या काही दिवसांत हा आकडा वाढून ३ लाख झाला. तर शनिवार आणि रविवारी येणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याने प्रवाशांचा आकडा आणखीच वाढून तो ५ लाख एवढा झाला. त्यामुळे सुरुवातीला मेट्रोतून १ कोटी प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर प्रवास भाड्यात अल्पशी वाढ करण्यात आली. तरीही मेट्रोचे प्रवासी काही कमी झाले नाहीत. आतापर्यंत ५ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रो सेवेमुळे पश्चिम रेल्वेलाही त्याचा चांगलाच फायदा झाला आहे. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात उतरून मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरील स्थानक गाठावे लागत असल्याने एकच गर्दी होत होती. मात्र आता मेट्रोमुळे दादर स्थानकापर्यंत प्रवासी न जाता अंधेरी स्थानकात उतरून मेट्रोने घाटकोपरपर्यंत प्रवास करतात आणि डाऊनला ट्रेन पकडतात. त्याचप्रमाणे काही प्रवासी हे सीएसटीकडे जाण्यासाठीही हाच पर्याय निवडतात. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या एका डब्यातील प्रवासी संख्या कमी झाली असून, प्रवाशांचा प्रवास सुकर झाल्याचे सांगण्यात येते. २00७ रोजी प्रत्येकी एका डब्यातून २८७ प्रवाशांचा प्रवास होत होता. आता २0१४ च्या अखेरीस हीच संख्या २२७ एवढी झाली आहे. हे पाहता एका डब्यातील प्रवासी संख्या २१ टक्क्यांनी कमी झाल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. २00७ पासून ४२ टक्क्यांनी प्रवासी वाहून नेण्याची क्षमताही वाढली आहे. (प्रतिनिधी)
२00७
सालापासून गर्दीच्या वेळेत लोकल सेवा २३ टक्क्यांनी वाढली आहे. तर प्रवासी संख्येत १२.६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत फक्त ९१ हजार ३५९ प्रवाशांची भर पश्चिम रेल्वेत पडली आहे. २0११-१२ साली ३४ लाख ९७ हजार ८0८ प्रवासी प्रवास करीत होते. २0१४-१५ साली हीच संख्या ३५ हजार ८९ हजार १६७ एवढी झाली आहे.