Join us  

तळकोकणासाठी वैद्यकीय महाविद्यालय देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 2:48 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही; रत्नागिरीतील कोरोना टेस्ट लॅबचे आॅनलाइन उद्घाटन

रत्नागिरी : आरोग्य यंत्रणा सुसज्ज पाहिजे. यासाठी डॉक्टर ही महत्त्वाची गरज आहे. त्यादृष्टीने तळकोकणात वैद्यकीय महाविद्यालय देण्याची आपली तयारी आहे, अशी घोषणा करतानाच त्यासाठी लगेच प्रस्ताव तयार करण्याची सूचनाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिली. रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालयाचा आॅनलाईन लोकार्पण सोहळा ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

या आॅनलाइन लोकार्पण सोहळ्यात मुंबईहून प्रधान सचिव प्रदीप व्यास, पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रयोगशाळा उभारणीचे हे काम आपले एकट्याचे नसल्याचे सांगून सर्व यंत्रणांना धन्यवाद दिले. स्वॅब चाचण्या सर्वसामान्य रूग्णांच्याही आवाक्यात असाव्यात, त्यात वेळ जाऊ नये, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कोरोना टेस्ट लॅब व्हावी, यासाठी प्रयत्न आहेत, असे त्यांनी सांगितले. मंत्री सामंत यांच्या भाषणातील संदर्भ घेत त्यांनी तळकोकणासाठी (रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी) वैद्यकीय महाविद्यालय देण्याची तयारीही दर्शवली. त्यासाठी प्रस्ताव देण्याची सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिली.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रत्नागिरीत कोरोना विषाणू लॅब झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या लॅबमध्ये अ‍ॅटोमेशन केल्यास अधिक चाचण्या करता येतील, असे त्यांनी सुचविले. हेच यंत्र कॅन्सर चाचण्यांसाठीही उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अपघातांची वाढती संख्या पाहाता ट्रामा केअर सेंटर उभारणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले. चाकरमानी आले आहेत, त्यांची चाचणी करा. तसेच रत्नागिरीत आयएमए या संघटनेचा उपयोग करून कोरोना मृतांची संख्या कमी करा, असे ते म्हणाले.संकट गेलेले नाहीलॅब आली म्हणजे आपण सुरक्षित झालो, संकट निघून गेले, असे समजू नका. आता जबाबदारी वाढणार आहे. लॅबमुळे रूग्णांची संख्या वाढलेली दिसेल. त्यामुळे संख्या कमी कशी करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. ही संख्या शून्यावर येईल, ते आपले यश असेल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनाचे आव्हान पत्करणारे आरोग्य यंत्रणेचे लोक ही खरी संपत्ती आहे. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.स्वत:कडे, कुटुंबाकडे पाहायला शिकवलेलॉकडाऊन केले आणि कुलुपाची चावी हरवली असे होता नये. लॉकडाऊन संपवून जगणे सुरळीत व्हायलाच हवे. त्यासाठी आरोग्य सुविधा वाढविलेल्या हव्यात, असे ते म्हणाले. विकास करत असताना आपण स्वत:ला विसरलो होतो. कोरोनाने लॉकडाऊनच्यानिमित्ताने आपल्याकडे, कुटुंबाकडे पाहायला शिकविले. कोरोनाने कुटुंब, घर दाखविले, काळजी कशी घ्यावी हेही दाखविले, असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :उद्धव ठाकरे