Join us  

Maratha Reservation: 'सरकार आणखी किती जीव घेणार?'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 7:05 PM

गेल्या ९ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चातीन दोन कार्यकर्त्यांना शनिवारी तब्येत खालावल्याने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई : गेल्या ९ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चातील दोन कार्यकर्त्यांना शनिवारी तब्येत खालावल्याने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ४० मराठ्यांनी जीव गमावल्यानंतर सरकार आणखी किती जीव घेणार आहे?, असा सवाल समन्वयक प्राध्यापक संभाजी पाटील यांनी उपस्थित केला आहे.पाटील म्हणाले की, गेल्या आठवड्याभरात तब्बल डझनभर कार्यकर्त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना रूग्णालयात भरती करावे लागले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार १५ नोव्हेंबरपर्यंत शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सारथी संस्थेवर नियुक्तीपासून मराठा विद्यार्थ्यांची वसतीगृहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज प्रकरण अशा विविध मागण्यांसाठी २ नोव्हेंबरपासून क्रांती मोर्चाने बेमुदत उपोषण पुकारले आहे. या मागण्या आधीच सरकारने मान्य केल्या असून त्यावर अंमलबजावणी होत नसल्याने क्रांती मोर्चाने उपोषण आंदोलन पुकारलेले आहे.परिणामी, मान्य केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठा कार्यकर्त्यांना उपोषण करावे लागत आहे, ही शोकांतिका आहे. त्यामुळे शांतपणे आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याऐवजी सरकार आंदोलन चिघळवत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. आंदोलनात कोणत्याही कार्यकर्त्याच्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, अशी माहिती समन्वयक निशांत सकपाळ यांनी दिली.सकपाळ म्हणाले की, तब्येत खालावल्याने काही कार्यकर्त्यांना रूग्णालयात दाखल केले असून काही कार्यकर्ते प्रकृती अस्वाथ्यानंतरही उपोषणस्थळी ठाण मांडून आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अधिक अंत न पाहता सरकारने तत्काळ मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन सकपाळ यांनी केले आहे.

टॅग्स :मराठा क्रांती मोर्चामराठा आरक्षण