Join us  

Maratha Reservation: 'स्वातंत्र्यानंतरही मराठा समाज मागासलेलाच'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 6:45 AM

याचिकाकर्त्यांचा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात युक्तिवाद

मुंबई : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा समाजाची आर्थिक आणि सामाजिक घडी नीट बसविली होती. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात या समाजाला प्रणेता मिळाला नाही. त्यामुळे या समाजाला उतरती कळा लागली. स्वातंत्र्यानंतर तर हा समाज सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही मागासलेला राहिला,’ असा युक्तिवाद मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात मंगळवारी केला.मराठा आणि कुणबी समाज एकच असला, तरी या दोन्ही समाजांच्या चालीरीती व राहणीमानात बराच फरक आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांच्यासाठी स्वतंत्र वर्ग निर्माण करण्यात आला, असे याचिकाकर्ते वैभव कदम यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील आरिफ बुकवाला यांनी न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सांगितले.छत्रपती शिवाजी महाराजांनी या समाजाची आर्थिक व सामाजिक घडी नीट बसविली होती. मात्र, त्यांच्यानंतर या समाजाला उतरती कळा लागली आणि ती आजतागायत कायम आहे. या समाजाचे आर्थिक स्थैर्य गेले. परिणामी, शैक्षणिक व सामाजिक मागसलेपण आले. आजही मराठा समाज शेतात राबत आहे, परंतु त्याचा योग्य तो मोबदला मिळत नसल्याने या समाजातील लोकांना आत्महत्या करावी लागत आहे, असे बुकवाला यांनी न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :मराठा आरक्षण