यंदा आंबा बागायतदार सुखावणार!
By Admin | Updated: February 14, 2015 22:27 IST2015-02-14T22:27:39+5:302015-02-14T22:27:39+5:30
यंदा पडणारी थंडी आंबा पीक उत्पादकांना दिलासा देणारी ठरत आहे. यंदाचे आंब्याचे पीक निश्चितच बागायतदारांचा उत्साह टिकवणारे राहील, अशी शक्यता झाडांना आलेल्या मोहरावरून व्यक्त केली जात आहे.

यंदा आंबा बागायतदार सुखावणार!
मेघराज जाधव ल्ल मुरुड
यंदा पडणारी थंडी आंबा पीक उत्पादकांना दिलासा देणारी ठरत आहे. यंदाचे आंब्याचे पीक निश्चितच बागायतदारांचा उत्साह टिकवणारे राहील, अशी शक्यता झाडांना आलेल्या मोहरावरून व्यक्त केली जात आहे.
मुरुड तालुक्यात १५९० हेक्टर क्षेत्रावर हापूस आंबा पिकाचे उत्पादनक्षम क्षेत्र असून शासनाच्या रोजगार हमी योजनेतून दरवर्षी १५ ते २० हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली येत आहे. शासनामार्फत हेक्टरी १०० झाडे लागवडीसाठी ५० रुपये प्रतिकलम तसेच खड्डे खोदणे, बुजविणे, अंतर्गत मशागत यासाठी ३ वर्षांत हेक्टरी ४६ हजार ९४५ रु.चे अनुदान दिले जाते. याखेरीज प्रत्येक झाडापाठी ६० रुपयांंच्या विमा हप्त्यासाठी शासनच खर्च करते.
कोकणात बहुतांशी आंबा लागवड डोंगर उताराच्या व वरकस पडीक जमिनीवर केली जाते. थोडी आम्लयुक्त जमीन आंबावाढीसाठी पोषक ठरते.
गतवर्षीही सुरुवातीला असेच पोषक वातावरण होते. त्यामुळे आंबा उत्पादकांना दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते.
कृषी विभागाकडून हापूस आंब्याच्या क्षेत्र विस्तारीकरणासाठी विशेष लक्ष दिले जाते, तथापि लाभार्थी पुढे का येत नाहीत ही अडचणीचीच बाब आहे. आगरदांडा, सावली, भोईघर, बोर्ली-मांडला, साळाव, वळके, शिरगाव या परिसरातील नवनवीन आंबा बागांचे व्यवस्थापन चांगले केले जाते. उत्तम हवामानाबरोबर उत्तम व्यवस्थापन केल्यास मोहोर संरक्षण उपाययोजना प्रभावी राबविल्यास हापूस आंब्याचे पीक चांगले मिळू शकते.
आधुनिक पद्धतीचे पॅक्लोब्युट्रॉ झोल या शास्त्रीय वाढ तंत्राचा अवलंब केला पाहिजे. मुरुड तालुक्यातील आंबा बागायतदारांच्या बागा कराराने देण्याचा कल बदलवयास हवा. स्वत: खतपाणी व मोहोर संरक्षण केल्यास त्यांना चांगल्याप्रकारे नफा मिळू शकेल व आर्थिक स्थैर्य लाभेल. चालू वर्षी फेब्रुवारीत देखील थंडीचे प्रमाण टिकून आहे. त्यामुळे आंबा चांगला मोहरला असून फळधारणेस सुरुवात झाली आहे. नवीन आंबा क्षेत्र लागवडीसाठी केवळ पारंपरिक हापूस वाण न निवडता त्यामध्ये किमान १०% लागवड रत्ना, सिंधू, पायरी या वाणातील असावी जेणेकरुन परागीकरण प्रभावीरीत्या होऊन उत्पादनात वाढ होऊ शकेल.
बागांच्या पुनर्जीवनाची गरज
जुन्या झाडांपासून उत्पन्न कमी येत असल्याने बागांचे पुनर्जीवन अर्थात छाटणी करायला हवी. यंदा निसर्गाने योग्य साथ दिल्यास गळ थांबेल आणि प्रत्येक झाडाला सरासरी १५० ते २५० आंब्याची फळे अपेक्षित धरल्यास प्रतिहेक्टरी सरासरी २ ते अडीच टन आंबा उत्पादन मिळू शकेल, असा अंदाज तालुका कृषी अधिकारी दिलीप भड यांनी व्यक्त केला.