Join us  

Mamata Banerjee In Mumbai: “भाजपला पराभूत करणं सोपं आहे”; ममता बॅनर्जींनी सांगितला ‘हा’ जबरदस्त फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 4:31 PM

Mamata Banerjee In Mumbai: केवळ स्थानिक पातळीवर नाही, तर राष्ट्रीय स्तरावरही भाजपचा पराभव करणे सहज शक्य आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून, अनेक नेतेमंडळींच्या त्या भेटीगाठी घेत आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपला पराभूत करणे सोपे आहे, असेही ममता दीदी यावेळी म्हणाल्या. 

या विशेष कार्यक्रमाला स्वरा भास्कर, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, मुकुल रोहतगी, मेधा पाटकर, रिचा चड्डा, तुषार गांधी, विद्या चव्हाण आदी मान्यवरांचा उपस्थित होते. तुम्ही सातत्याने मैदानात उतरून भाजपसोबत लढत राहायला हवे. नाहीतर ते तुम्हाला बाहेर ढकलून देतील. पश्चिम बंगालमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असतानाही मला बाहेर पडावे लागले. जेणेकरून इतरही प्रादेशिक पक्ष बाहेर पडतील आणि राजकारणात स्पर्धा तयार होईल, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

भाजपचा पराभव सोपा आहे

या कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी राजकीय मुद्द्यांवर बोलताना भाजपच्या पराभवाचा फॉर्म्युला सांगत भाजपविरोधी आघाडीचेही अप्रत्यक्षपणे संकेत दिल्याचे सांगितले जात आहे. देशात भाजपला पराभूत करायचे असेल, तर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले, तर राष्ट्रीय पातळीवर भाजपला पराभूत करणे सहज शक्य आहे, असा दावा ममता बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना केला. 

शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आला

शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आला, असा मोठा आरोप करत, भाजप हा क्रूर आणि अलोकतांत्रिक पक्ष असल्याची बोचरी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली. याशिवाय, चित्रपट दिग्दर्शक महेश भट तुम्हाला लक्ष्य करण्यात आले होते, शाहरुख खानलाही त्रास देण्यात आला. जर आपल्याला जिंकायचे असेल तर आपल्याला लढले आणि बोलले पाहिजे. तुम्ही आम्हाला राजकीय पक्ष म्हणून मार्गदर्शन करा आणि सल्ला द्या, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले. 

टॅग्स :ममता बॅनर्जीभाजपामुंबई