Join us  

दिशा सालियान प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंसोबत दुरावा? फडणवीस म्हणाले, 'त्यांच्या दुसऱ्या चेहऱ्यामागे...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 11:13 AM

दिशा सालियान प्रकरणाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचे दोन चेहरे आहेत असं म्हटलं आहे.

Devendra Fadnavis : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणात राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) तपास सुरु आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून सातत्याने केला जात होता. मात्र त्यासंदर्भातील पुरावे अद्यापही समोर आले नव्हते. दुसरीकडे याप्रकरणावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे भाष्य केलं आहे.

दिशा सालियान प्रकरणावरुन भाजपने आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दिशा सालियानने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता. त्यावेळी उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप करण्यात येत होता. शेवटी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी महायुती सरकारने एसआयटीची स्थापना केली. याबाबत मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना दिशा सालियान प्रकरणामुळे उद्धव ठाकरे आणि आणि तुमच्यात दुरावा निर्माण झाला का असा सवाल विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

"दिशा सालियान प्रकरणात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एसआटीची स्थापना करण्यात आली. त्याची चौकशी सुरु आहे. जेव्हा ते सरकारमध्ये होते तेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो. मी कोणाला घाबरत नव्हतो. पण त्यावेळी मी कधी याबाबत भूमिका घेतली नाही. त्यांचा अहंकार हा एवढा मोठा आहे की, त्यांच्यासमोर काहीही करा तरी तुम्ही शून्यच असता. दुखावलो गेल्याचा प्रश्नच नाही. जेव्हा तुम्ही कुणासाठी जगातल्या सगळ्या गोष्टी करता त्यानंतर ती व्यक्ती अशा पातळीवर जाते जिथे तु्म्हाला, तुमच्या कुटुंबाला टार्गेट केल्याचा प्रयत्न केला जातो. मी काचेच्या घरात राहत नाही आणि त्यामुळेच कोणीही माझे काही बिघडवू शकत नाही. अडीच वर्षात यांनी माझ्या केसापासून नखापर्यंत सगळ्या गोष्टींची चौकशी केली. सुपारी देऊन मुंबईत एक पोलीस आयुक्त माझ्या चौकशीसाठी बसवले. त्यांचा जो चेहरा दिसतो आणि जो आहे त्याच्यात खूप फरक आहे. त्यांचे दोन चेहरे आहेत. समोर नसलेल्या चेहऱ्यामध्ये अहंकार भरला आहे," असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

दरम्यान, दिशा सालियन हिने सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवस आधी मालाडमधील तिच्या घराच्या बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव ओढले जात आहे. दिशा सालियन प्रकरणाच्या चौकशीची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी सातत्याने केली होती. दिशा सालियनच्या आत्महत्येत आदित्य ठाकरे यांचा मोठा वाटा आहे, असा आरोप नितेश राणेंनी केला होता. 

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेआदित्य ठाकरे