Join us  

महाराष्ट्र सरकारचे 'चलो कश्मीर'; MTDC दोन रिसॉर्ट बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 3:13 PM

रिसॉर्टसाठी 2 कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : जम्मू-काश्मीरला फिरायला जाणाऱ्या राज्यातील पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. महाराष्ट्र सरकार आता जम्मू-काश्मीरमध्ये दोन रिसॉर्ट बांधणार आहे. विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असणार आहे. 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) जम्मू-काश्मीरमध्ये दोन रिसॉर्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारला आणि जम्मू-काश्मीरमधील राज्यपालांना पाठविण्यात येणार आहे, याबाबतची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मंगळवारी दिली. 

राज्यातून अनेक पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये जातात. तसेच, अमरनाथ यात्रेसाठीही अनेक भाविक राज्यातून जम्मू-काश्मीरला जातात. त्यामुळे श्रीनगर येथील पेहलगाममध्ये रिसॉर्ट उभारण्याचा विचार आहे. यासाठी तेथील केंद्र सरकारची किंवा खासगी जागा खरेदी केली जाणार आहे. यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच, या रिसॉर्टसाठी 2 कोटींचा खर्च अपेक्षित असून यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविणार आहे, असेही जयकुमार रावल यांनी सांगितले.  

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनुसूचित जमातीसाठी सात अतिरिक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी 254 अतिरिक्त विज्ञान शिक्षक नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात आली. 

याचबरोबर, भिलार येथील पुस्तकांचे गाव हा उपक्रम आता स्वतंत्र योजना म्हणून सुरू राहणार आहे. तसेच, लोकायुक्त कार्यालयासाठी उप प्रबंधक पद निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. गुरु-त्ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यासाठी परताव्याच्या अधीन राहून देण्यात आलेली 61 कोटी रक्कम अनुदानात रुपांतरित करण्यास मान्यता सुद्धा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आली.  

टॅग्स :जम्मू-काश्मीरमहाराष्ट्रजयकुमार रावलकलम 370