Join us  

Maharashtra Government: नजर चुकवून थेट गाठले यशवंतराव चव्हाण केंद्र - सुनील भुसारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 5:41 AM

विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा हे बंडखोर अजित पवार यांच्यासोबत गैरसमजातून राजभवनापर्यंत गेले.

जव्हार : विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा हे बंडखोर अजित पवार यांच्यासोबत गैरसमजातून राजभवनापर्यंत गेले. मात्र हा सगळा घोळ लक्षात येताच निष्ठेला महत्व देत मंत्रीपदाच्या स्वप्नाला तिलांजली देत ते सरळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आले. यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्यानंतर सर्वसामान्य मतदारांमध्ये गोंधळ झाला. सत्ता स्थापनेवरून सुरू असलेला हा गोंधळ पाहून जनता संभ्रमावस्थेत असल्याचे पाहायला मिळाले. अनेक नेत्यांच्या पक्षांतरांच्या चर्चा होऊ लागल्या. अशावेळी भुसारा यांचे नावही चर्चेत आले. कारण प्रारंभी गैरसमजातून दहा ते बारा आमदार जेव्हा अजित पवारांसोबत राजभवनात गेले तेव्हा राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसाराही त्यावेळी उपस्थित होते.मात्र ही फक्त अजित पवारांची भूमिका असून याच्याशी पक्षाचा संबंध नसल्याचे लक्षात येताच भुसारा यांनी सर्वांची नजर चुकवून थेट यशवंतराव चव्हाण केंद्र गाठत पवार यांची भेट घेऊन घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली.भुसारा यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही त्यांचे अभिनंदन केले.मला पक्षाची बैठक असल्याचा फोन आला. त्यामुळे मी घाईतच दिलेल्या वेळेत सांगितलेल्या ठिकाणी पोहचलो. काही आमदारही त्याठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे काही गडबड आहे, असे त्यावेळी अजिबात वाटले नाही. संशय घेण्यासारखे काही नव्हते. राजभवनात नेल्यावर शपथविधी झाला. तेव्हा वरिष्ठ नेतेच दिसत नसल्याने मला संशय आला, यामुळे मी गुपचूप तिथून निघून शरद पवार यांना भेटलो. भाजपविरोधात ज्या मतदारांनी मला मतदान केले, त्या आदिवासी समाजाशी मी कधीच गद्दारी करू शकणार नाही. सत्ता, मंत्रीपद निष्ठेपुढे फिकी आहेत. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान आहे.- सुनील भुसारा, आमदार, विक्र मगड

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसविक्रमगड