Join us  

एका क्लिकवर, मतदारांचे नाव; जुन्या याद्या कालबाह्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 3:33 AM

Maharashtra Election 2019: निवडणुकीच्या दिवशी मतदार यादीतला घोळ, मतदार यादीत नाव नसणे, मतदान केंद्र माहीत नसणे या नेहमीच्या समस्या.

मुंबई : निवडणुकीच्या दिवशी मतदार यादीतला घोळ, मतदार यादीत नाव नसणे, मतदान केंद्र माहीत नसणे या नेहमीच्या समस्या. मात्र सोमवारी बोरीवली मतदान केंद्रावरील मतदारांची ही समस्या हेल्प डेस्कवरील विद्यार्थ्यांनी काही सेकंदांतच सोडविली.

बोरीवली मतदारसंघात अनेक मतदान केंद्रांवर निर्मला फाउंडेशनचे विद्यार्थी लॅपटॉप घेऊन मतदार यादीत नाव न सापडणाऱ्या मतदारांना मदत करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यासाठी आॅफलाइन सर्च इंजीनची मदत घेण्यात आली. बोरीवलीचे उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्या पुढाकाराने ही संकल्पना राबविण्यात आली. यामुळे केवळ नाव कोणत्या मतदारसंघात आहे किंवा केंद्र माहीत नाही यामुळे मतदान न करणाºया अनेक नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता आल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली.

मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाकडून दरवेळी हेल्प डेस्कची सुविधा करण्यात येते. त्यांच्याकडे सगळ्या याद्या या पुस्तक स्वरूपात असून ज्या मतदाराचे नाव गहाळ आहे त्याचे नाव त्या यादीत शोधले जाते. मात्र या प्रक्रियेला खूप वेळ लागत होता. यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाकडून सर्च इंजीन नावाचे सॉफ्टवेअर डेव्हलप केले गेले. बोरीवलीतील उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी ही सुविधा आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध व्हावी यासाठी पुढाकार घेतला आणि निर्मला फाउंडेशनच्या बीएसस्सी आयटी विभागाच्या १०० विद्यार्थ्यांना याचे स्वत: मार्गदर्शन केले.

त्यास्तव त्यांची कार्यशाळाही घेण्यात आल्याची माहिती बीएस्ससी आयटी विभागाच्या प्रमुख वैशाली मिश्रा यांनी दिली. एरव्ही मतदार यादीत नाव न सापडल्याने जी तारांबळ उडते त्यापेक्षा मतदारांना या सोयीमुळे आपल्या मतदान केंद्रावर जाण्याची सुविधा झाल्याची माहिती या उपक्रमामुळे झाल्याची माहिती त्यांनी दिली.

विशेष म्हणजे अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने सर्च इंजीनवर नाव शोधताना अडचण येऊ शकते यासाठी ही सुविधा आॅफलाइन ठेवण्यात आली. बोरीवली, मनोरी अशा मतदारसंघात या विद्यार्थ्यांनी बीएलओ अधिकाºयांच्या हाताखाली मतदारांना या उपक्रमातून मदत केल्याची माहिती मिश्रा यांनी दिली. सर्च इंजीनवरून नाव शोधताना कोणत्या यादीत, कोणत्या विभागात नाव शोधायचे या तांत्रिक बाबी असल्याने बीएस्सी आयटीच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून डिजिटल इंडिया बनविण्यासाठी व लोकशाहीला बळकट कारण्यासाठी खºया अर्थाने डिजिटल तंत्रज्ञानाची कास धरल्याची प्रतिक्रिया वैशाली मिश्रा यांनी दिली.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019डिजिटल