कळंबोलीत कमी दाबाने पाणीपुरवठा
By Admin | Updated: June 15, 2015 22:52 IST2015-06-15T22:52:40+5:302015-06-15T22:52:40+5:30
कळंबोली येथील सेक्टर १२ ते १५ या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

कळंबोलीत कमी दाबाने पाणीपुरवठा
तळोजा : कळंबोली येथील सेक्टर १२ ते १५ या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सेक्टर १४ पाण्याच्या टाकीला गळती लागलेली असून या टाकीच्या डागडुजीचे काम करण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे.
सध्या या परिसरात पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. काही दिवसांपूर्वी महिलावर्गाने कळंबोलीतील सिडको कार्यालयावर धडक दिली होती. सेक्टर १२ ते १५ परिसरातील साधारण २००हून अधिक कुटुुंबं राहत आहेत.
सध्या येथील नागरिकांवर पाणी संकट ओढावलेले आहे. परिसरातील जलवाहिन्या जीर्ण झाल्यामुळे नळाला खराब व गढूळ पाणी येण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. सेक्टर १४ येथील पाण्याच्या टाकीची डागडुजी झाल्यास परिसरातील पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटू शकेल.
सेक्टर ४,५,६ परिसरातील जुनाट जलवाहिनी बदलण्याची मागणी रहिवासी करत आहेत.
जीर्ण जलवाहिन्या आणि झोपडपट्टी परिसरात वारंवार होणाऱ्या गळतीमुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
सेक्टर १४ येथील पाण्याच्या टाकीच्या दुरु स्तीचे काम पावसाळा सुरू झाला तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे उन्हाळ्याबरोबरच पावसाळ्यातही नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्याच्या टाकीची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात येत असून त्यानंतर परिसरातील पाणीपुरवठा सुलभ होईल अशी माहिती एका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. (वार्ताहर)
कळंबोली परिसराला योग्य व मुबलक पाणीपुरवठ्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासोबत बैठका सुरू आहेत. समस्यांचे निवारण लवकरात लवकर केले जाईल.
- एन.आर.निमकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग