मिठीजवळ वस्त्यांमध्ये पाणी शिरणार?
By सचिन लुंगसे | Updated: May 26, 2025 12:09 IST2025-05-26T12:07:44+5:302025-05-26T12:09:39+5:30
यंदा मुंबईतही पाऊस नेहमीपेक्षा लवकर येण्याची अपेक्षा आहे. मात्र, ३१ मे रोजीची डेडलाइन असलेली नालेसफाई अजून गाळातच रुतली आहे. मिठी नदीतही बहुतांश ठिकाणी जलपर्णी पाण्यावरच तरंगताना दिसत आहे. पश्चिम उपनगरांतील नालेसफाईसुद्धा समाधानकारक नाही. रसराज नाला, इर्ला नाल्यातून गाळ काढण्याचे काम अजून सुरूच आहे. स्वच्छतेनंतर नागरिक नाल्यात पुन्हा कचरा टाकताना दिसत आहेत, असे 'लोकमत'ने घटनास्थळी जाऊन केलेल्या पाहणीत आढळले आहे.

मिठीजवळ वस्त्यांमध्ये पाणी शिरणार?
सचिन लुंगसे
मुंबई : पवई तलावातून उगम पावत अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या मिठी नदीच्या स्वच्छतेबाबत महापालिकेने सफाईचे दावे केले असले तरी सध्याची परिस्थिती पाहता मोठ्या पावसात मिठी नदीमधील पाणी लगतच्या वस्त्यांमध्ये शिरण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. महिन्याभरापूर्वी जलपर्णीने भरलेल्या मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली असली तरी बहुतांश ठिकाणी जलपर्णी पाण्यावरच तरंगताना दिसत आहे.
मरोळ परिसरात मिठी नदीत मोठ्या प्रमाणावर कचरा असल्याचे निदर्शनास येते. विमानतळ परिसरात नदीला मिळणारे नाले पहिल्यांदा साफ करणे गरजेचे होते; परंतु आजही या नाल्यांत पाणी कमी आणि गाळ जास्त असल्याचे चित्र आहे. विमानतळाच्या धावपट्टीखालून वाहत नदी कलिना रोडपर्यंत गाळानेच भरली आहे. तसेच कुर्ला पश्चिमेकडील संदेशनगर, क्रांतीनगर परिसरात वाहणारी निम्मी नदी आजही जलपर्णीने भरली आहे. क्रांतिनगरचा पूल ओलांडून कलिना रोडकडे वाहणाऱ्या नदीत एका बाजूला गाळ काढणारी यंत्रसामग्री तैनात असली तरी अत्यंत धिम्यागतीने काम सुरू आहे
नदीची योग्य प्रकारे सफाई न झाल्याने पुराचा धोका
१. कुर्ला ते सायनदरम्यान रेल्वे रुळांसह एलबीएस मार्गावर नदीचे पाणी येत असून, भरतीदरम्यान हे पाणी तुंबल्याने हे दोन्ही मार्ग ठप्प होतात. कारण नदी आणि तिला मिळणारे नाले आजही पुरेशा प्रमाणात साफ झाले नसल्याने पुराचा धोका कायम आहे.
२. कमानी सिग्नल, शीतल सिग्नल, सोनापूर गल्ली, कल्पना सिनेमा, कामरान सिनेमा, कुर्ला डेपोसह आग्रा रोड बसस्थानक आणि आसपासच्या परिसरातील ख्रिश्चन गाव, क्रांतिनगर असे अनेक परिसर मोठ्या पावसाळ्यात जलमय होतात, असे स्थानिक रहिवासी राकेश पाटील यांनी सांगितले.
३. २६ जुलै २००५ नंतर मिठी नदीच्या विकास व संरक्षणासाठी केंद्राने मदतीची ३ घोषणा केली होती. त्यानुसार, गेल्या १९ वर्षांत मिठी नदीच्या विकासावर १ हजार ६५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
५२ टक्के सफाई पूर्ण
मिठी नदीला २००६ मध्ये आलेल्या पुरानंतर शहरातील मोठ्या व छोट्या नाल्यांसह मिठी नदीतील गाळ काढण्याचे कामही पालिकेकडून हाती घेण्यात येते. यंदा मिठीतून २ लाख १४ हजार मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत १ लाख १३ हजार मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. शिवाय मिठीच्या काठावर काढलेला गाळ पडून राहिल्याने दुर्गंधी सुटली आहे. कंत्राटदाराने मुख्य रस्त्यालगत व मेट्रो स्थानकाजवळ उघड्यावर गाळ टाकल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रसायनमिश्रित पाणी...
एलबीएस रोड परिसरात भंगार विक्रेत्या दुकानांच्या मागील बाजूस वाहणारी नदी आहे की नाला हेच ओळखता येत नाही. तसेच रसायन मिश्रित पाण्याचा तर नदीत कहर असून, या संपूर्ण पट्टयात नदीची रया गेली आहे. बीकेसी परिसरात काहीशी नदी साफ दिसत असली तरी येथून पुढे दरवर्षीप्रमाणे यंदाही सायनपासून ठाण्यापर्यंत वाहणाऱ्या एलबीएस रोडवर मिठी नदीच्या पुराचे पाणी येण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.