लोकल झाली नव्वदीची!
By Admin | Updated: February 4, 2015 01:01 IST2015-02-04T01:01:25+5:302015-02-04T01:01:25+5:30
स्टीम इंजिन (बाष्प इंजिन) असलेली पहिली ट्रेन धावली ती बोरीबंदर ते ठाणे १६ एप्रिल १८५३ रोजी...वेळ दुपारी ३.३५...३४ किलोमीटरचा प्रवासासाठी दीड तास...

लोकल झाली नव्वदीची!
मुंबई : स्टीम इंजिन (बाष्प इंजिन) असलेली पहिली ट्रेन धावली ती बोरीबंदर ते ठाणे १६ एप्रिल १८५३ रोजी...वेळ दुपारी ३.३५...३४ किलोमीटरचा प्रवासासाठी दीड तास...हाच काय तो इतिहास लोकलमधून प्रवास करणाऱ्या ७५ लाख प्रवाशांना माहीत आहे. मात्र त्यानंतर ज्या ईएमयु लोकलमधून लाखो प्रवासी करत आहेत, अशा लोकलच्या पहिल्या प्रवासालाही ९0 वर्ष पूर्ण झाली असून त्याची नव्वदी मध्य रेल्वेकडून साजरी करण्यात आली. पहिली ईएमयु लोकल ही व्हीटी (आताची सीएसटी) ते कुर्ला अशी हार्बर मार्गावर धावली होती.
भारतीय रेल्वेची तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेची सुरुवात ब्रिटीशांनी भारतात आणि आशिया खंडात १८५३ साली केली. बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली स्टीम इंजिन असलेली ट्रेन धावल्यानंतर या ट्रेनचा विकास होण्यास बराच कालावधी लागला आणि त्यानंतर पहिली ईएमयु लोकल धावण्यास १९२५ साल उजाडले. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी चार डब्यांची असलेल्या ईएमयु लोकलला तेव्हाचे मुंबईचे गर्व्हनर सर लेस्ली विल्सन यांनी हिरवा कंदील दाखविला होता. ही लोकल व्हीटी ते कुर्ला अशी हार्बर मार्गावर धावली. त्याला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आणि १९२५ सालात दररोज १५0 फेऱ्या होऊ लागल्या. फेऱ्यांमधून रोज २ लाख २0 हजार प्रवासी प्रवास करत होते. मिळणारा प्रतिसाद पाहता त्यानंतर या लोकल फेऱ्या टप्प्याटप्याने वाढविल्या. ईएमयु लोकलमध्ये बदल होत असून सिमेन्स कंपनीच्या लोकल सध्या धावत आहेत. तर यापुढे बम्बार्डियर कंपनीच्या लोकल ताफ्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
लोकलचा प्रवास
१९२५
हार्बरवर चार डब्यांची लोकल
१९२७
मेन लाईन आणि हार्बरवर आठ डब्यांची लोकल
१९६१
मेन लाईनवर नऊ डब्यांची लोकल
१९८६
मेन लाईनवर कल्याणपर्यंत बारा डब्यांची लोकल
१९८७
कर्जतपर्यंत बारा डब्यांची लोकल
२00८
कसारापर्यंत बारा डब्यांची लोकल
२0१0
ट्रान्स हार्बरवर बारा डबा लोकल
२0१२
मेन लाईनवर पंधरा डबा लोकल