गावांना भारनियमनाचा जाच
By Admin | Updated: August 26, 2014 02:06 IST2014-08-26T01:33:15+5:302014-08-26T02:06:46+5:30
परिसरातील आदिवासी गावात ग्राहकांना योग्य क्षमतेने वीज पुरवठा होत नाही. वीज वाहक तारा, खांब या यंत्रणा जर्जर झाल्या आहेत.

गावांना भारनियमनाचा जाच
अनिरुध्द पाटील, बोर्डी
परिसरातील आदिवासी गावात ग्राहकांना योग्य क्षमतेने वीज पुरवठा होत नाही. वीज वाहक तारा, खांब या यंत्रणा जर्जर झाल्या आहेत. खंडित वीज व भारनियमनामुळे दैनंदिन जीवनात अडथळ्याने मानसिक खच्चीकरण होत आहे. दर्जेदार, पुरेशा दाबाची वीज मिळून तिमिरातून तेजाकडे जाणारा विकास कधी साधला जाणार? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
बोर्डी परिसरातील गावांमध्ये वीज समस्येचा प्रश्न गंभीर बनला आहे. रोहित्र उभारणी, जीर्ण खांब, तारा बदलणे इ. देखभाल दुरूस्तीची कामे अपूर्णावस्थेत आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६८ वर्षात आदिवासी पाड्यापर्यंत वीज पोहोचलेली नाही. समुद्रालगत गावांमध्ये भरतीच्या वेळी वाहणारे वारे, क्षारयुक्त हवा, रेताड जमीन यामुळे तारा तुटणे, लोखंडी खांबांना गंज लागणे, सिमेंट खांबांचे प्लास्टर खिळखिळे होणे हे प्रकार घडतात. पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्याने कललेले खांब अनेक ठिकाणी दिसतात. वायरमनला खांबावर चढणे धोकादायक आहे. उपाययोजनेबाबत विविध ग्रामपंचायतींनी वीज कार्यालयाशी संपर्क साधला आहे, तरीही कार्यवाही होत नसल्याची खंत नरपड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रगती राऊत यांनी व्यक्त केली आहे.
आॅक्टोबर २०१२ पासून फिडरनिहाय भारनियमन सुरू आहे. वितरण व वाणिज्यिक हानी जास्त असलेल्या ई.एफ.जी भागात भारनियमन करण्यात येते. नरपड, चिखले, चिंबाणे, कोसबाड, रामपूर, अस्वाली, जांबुगाव या आदिवासी बहुल गावांना फटका बसत आहे. स्वयंचलित मीटर वाचन, देयक वसुली, थकबाकीदाराचा वीज पुरवठा खंडित करणे या आधारे महावितरणने वीजयंत्रणा सक्षम केली आहे. वीज चोरांमुळे नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना भारनियमनाचा जाच का? वीज अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.