मुंबई : काँग्रेस पक्षासह देशभरातील २२ राजकीय पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या शेजारी बसून सक्रिय पाठिंबा दिला असला, तरी राज्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते या ‘बंद’मध्ये कुठेही दिसले नाहीत. अजित पवार मुंबईत असूनही त्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरविली.‘बंद’मध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते कोठे आहेत, अशी विचारणा केली असता, अजित पवार मुंबईत आहेत, पण ते कुठे आहेत हे सांगता येणार नाही. आपण छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी आलो आहोत, असे राष्टÑीय सरचिटणीस हेमंत टकले यांनी सांगितले. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, आपण इस्लामपूरला आहोत. कोणते नेते कोणत्या शहरात आंदोलनात आहेत ते माहिती घेऊन सांगतो, असे म्हणत त्यांनी फोन बंद केला. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी परळी वैजनाथ येथे मोर्चा काढला. मात्र, खा. सुप्रिया सुळे, माजी अध्यक्ष भास्कर जाधव, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील असे वरिष्ठ नेते आंदोलनात समोर आल्याचे दिसले नाही. काँग्रेसने वरिष्ठ नेत्यांना जिल्हानिहाय जबाबदारी दिली होती.>मनसेने टायमिंग साधलेकाँग्रेसने पुकारलेल्या बंदमध्ये मनसे भाव खाऊन गेली. मुख्यमंत्री सिद्धिविनायक मंदिरात आले असताना त्यांच्या गाड्या अडविण्याचा, काही ठिकाणी गाड्या फोडण्याचा, तर एपीएमसी मार्केट बंद करण्यात मनसेने पुढाकार घेतला. जे मनसेला जमते ते राष्टÑवादीला का नाही जमले, असा सवाल काँग्रेसच्या एका नेत्याने केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची ‘भारत बंद’कडे पाठ
By अतुल कुलकर्णी | Updated: September 11, 2018 05:35 IST