Join us  

प्लॅस्टिक विरोधी चळवळ आणखी बळकट करू या, सोशल मीडियावर पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 2:16 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्टचे औचित्य साधत नागरिकांना देशास प्लॅस्टिकमुक्त करण्याचे आवाहन केले; आणि देशभरातून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्टचे औचित्य साधत नागरिकांना देशास प्लॅस्टिकमुक्त करण्याचे आवाहन केले; आणि देशभरातून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधानांनी प्लॅस्टिकमुक्तीचे आवाहन केल्यानंतर काही क्षणांतच त्याचे सकारात्मक पडसाद सोशल मीडियावर उमटले. विशेषत: शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीदेखील पंतप्रधानांनी शिवसेनेच्या प्लॅस्टिकच्या मुद्द्याला हाती घेतल्याने त्यांचे आभार मानत प्लॅस्टिकविरोधातील चळवळीला आणखी बळ मिळेल, असा आशावाद व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या भाषणात प्लॅस्टिकला हात घातला. ते म्हणाले, २ आॅक्टोबरला आपण आपल्या देशाला प्लॅस्टिकमुक्त करू शकतो. घरातील प्लॅस्टिक असो, बाहेर रस्त्यावर पडलेले प्लॅस्टिक असो, सर्व एकत्र करा. नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतींनी ते एकत्र जमा करण्याची व्यवस्था करावी.येत्या २ आॅक्टोबरला देशाला प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या दिशेने आपण एक पहिले ठोस पाऊल उचलू शकतो का? प्लॅस्टिकच्या पुन:प्रक्रियेसाठी काय करू शकतो? असे आवाहन स्टार्टअप, तंत्रज्ञ, उद्योजकांना मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांच्या या मुद्द्याला अधोरेखित करत पर्यावरणासाठी कार्यरत असलेल्या ह्युमिनिटी फाउंडेशनने सांगितले की, प्लॅस्टिकमुक्तीसाठी आपल्यालाच मोहीम हाती घ्यावी लागेल. आपल्याला त्यासाठी पर्यायी व्यवस्थाही द्यावी लागेल.प्रत्येकाने कापडी पिशवी वापरणे गरजेचे आहे. वातावरणनिर्मिती केली पाहिजे. दिवाळीत आपण कापडाची पिशवी भेटवस्तू म्हणून दिली पाहिजे. भारतीय पर्यावरण चळवळीच्या मते मुळातच केवळ सिंगल युज प्लॅस्टिक नाही, तर सर्वच प्रकारच्या प्लॅस्टिकवर बंदी घातली पाहिजे. मुंबई महापालिकेने प्लॅस्टिक बंदीबाबत उल्लेखनीय पाऊल उचलले असले तरी त्यांनाही म्हणावे तसे यश प्राप्त झालेले नाही. प्लॅस्टिक बंदीवर उपाय एकच तो म्हणजे प्रत्येकाने स्वत:पासून प्रयत्न करणे हा होय.जनजागृती गरजेचीसांगली, कोल्हापूर आणि पुण्यात महापूर आला; पण तिकडे मदत ज्या पाकिटांत पाठविली ती पाकिटे प्लॅस्टिकचीच होती. प्लॅस्टिक बंदी करायची असेल तर सरकारनेच याबाबत सुरुवात केली पाहिजे. यासाठी सिंगल युज प्लॅस्टिक बंद करणे हा उपाय योजतानाच शक्य त्या स्तरावर पहिल्यांदा जनजागृती केली पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्लॅस्टिक बंदीदरम्यान छोटे व्यापारी, मोठे व्यापारी असा भेदभाव करता कामा नये. सरकार आणि नागरिकांनी एकत्र येत याबाबत काम केले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्याबाबत विचार केला पाहिजे.- सुशांत गुंजाळ, प्लॅस्टिक व्यापारी

टॅग्स :प्लॅस्टिक बंदीनरेंद्र मोदीमुंबई