Join us  

कांदिवलीतील रक्तपेढीत वर्षभरात दोन हजार युनिटपेक्षा कमी रक्तसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 5:27 AM

माहिती अधिकारातून उघड, ४३४ युनिट साठा मुदत संपल्यामुळे वाया

मुंबई : कांदिवली शताब्दी रुग्णालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रक्तपेढीत गेल्या वर्षभरात रक्तसाठा दोन हजार युनिटपेक्षा कमी जमा झाल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या रक्तपेढीसंदर्भातील नियमांनुसार, रक्तपेढीत किमान दोन हजार युनिट रक्तसाठा जमा व्हावा लागतो, मात्र तसे नसल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नोटीस वा कारवाईला रक्तपेढीस सामोरे जावे लागते.

अन्न व औषध प्रशासनाच्या नियमावलीनुसार, रक्तपेढीमध्ये तीन वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, प्रयोगशाळेतील चाचणी करणारे अधिकारी व अन्य कर्मचारी असणे गरजेचे आहे. तसेच रक्तपेढीत किमान दोन हजार युनिट रक्तसाठा जमा झाला पाहिजे. रक्तपेढीतील प्रत्येक गोष्ट रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली होणे गरजेचे आहे. माहिती अधिकारानुसार, गेल्या पाच वर्षांत कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रक्तपेढीत वाया गेलेल्या युनिट्सचे प्रमाण कमी होत गेले आहे. २०१८ साली केवळ १६ युनिट रक्तसाठा मुदत संपल्यामुळे वाया गेला आहे. मागील काही वर्षांत या रक्तपेढीत अधिक रक्तसाठा वाया जात होता, हा मुद्दा विधानसभेतही चर्चेत आला होता. परंतु आता या युनिट्सचे प्रमाण कमी झाले आहे.

पाच वर्षांत या रक्तपेढीतील एकूण ४३४ युनिट रक्तसाठा मुदत संपल्यामुळे वाया गेल्याचे उघड झाले आहे. गेल्या पाच वर्षांत या रक्तपेढीत ११ हजार ४७२ युनिट रक्तसाठा जमा झाला आहे. यापैकी, ११ हजार ३१५ युनिट रक्तसाठ्याचा वापर रुग्णांसाठी करण्यात आल्याची माहिती माहिती अधिकारात मिळाली आहे.

दुर्लक्ष केल्याचे तपासणीअंती समोररक्तची तातडीने गरज असताना त्याचा साठा व्यवस्थित करणे आवश्यक आहे. मात्र याकडे कांदिवली शताब्दी रुग्णालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रक्तपेढीने दुर्लक्ष केलयाचे तपासणीत समोर आले आहे.

टॅग्स :रक्तपेढी