Join us  

Lakhimpur Kheri : शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हिंसक प्रयत्न, पवारांनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 2:59 PM

Lakhimpur Protest : आमच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा हिंसक प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथील घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, असे पवार यांनी म्हटलं आहे. 

ठळक मुद्देआमच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा हिंसक प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथील घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, असे पवार यांनी म्हटलं आहे. 

मुंबई - लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना 45 लाख आणि जखमींना 10 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल, अशी माहिती एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी दिली. मात्र, या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त होत असून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. 

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे २५ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या एका विधानाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आठवडाभरानंतर हिंसक वळण लागले आहे. या हिंसाचारामध्ये एक पत्रकार आणि चार शेतकऱ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन भाजपा कार्यकर्ते आणि एका ड्रायव्हरचाही समावेश आहे. त्यांची लिंचिंग झाल्याचा आरोप होत आहे. या घटनेवर देशभरातील विरोधी पक्षांकडून सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. शरद पवार यांनीही ट्विट करुन या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

आमच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा हिंसक प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथील घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, असे पवार यांनी म्हटलं आहे. 

प्रशांत कुमार म्हणाले

"काल लखीमपूर खेरी येथे मारल्या गेलेल्या 4 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकार 45 लाख रुपये आणि एक सरकारी नोकरी देईल. तर, जखमींना 10 लाख रुपयांची मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवला जाईल. तसेच उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश या प्रकरणाची चौकशी करतील. एवढेच नाही, तर सीआरपीसीचे कलम 144 लागू असल्याने राजकीय पक्षांच्या नेत्यांना जिल्ह्या दौऱ्याची परवानगी देण्यात आली नाही. मात्र, शेतकरी संघटनांच्या सदस्यांना येथे येण्यास परवानगी आहे, असेही प्रशांत कुमार म्हणाले.

नाना पटोलेंचा योगी सरकारवर निशाणा

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या पीडित शेतकरी कुटुंबीयांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र निषेध केला आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून अजयसिंह बिष्ट यांच्या नेतृत्वाखालील तालिबानी राज असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

राकेश टिकैत यांनाच ठरवलं जबाबदार -

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी लखीमपूर हिंसाचारासाठी भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांना जबाबदार ठरवले आहे. मिश्रा म्हणाले, मी आणि माझा मुलगा त्यावेळी घटना स्थळी उपस्थित नव्हतो. या प्रकरणाची न्ययालयीन चौकशी व्हायला हवी. सत्य सर्वांसमोर येईलच. तसेच, 'हिंसाचारात आमच्या कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाला आहे. त्यांनाही भरपाई मिळायला हवी. या घटनेसंदर्भात आम्हीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा केली आहे. जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी,' असेही मिश्रा म्हणाले. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसलखीमपुरशेतकरी आंदोलन