Join us  

शेलार मामांचं 'ते' वाक्य नसल्याची खंत, 'तान्हाजी' चित्रपटात इतिहासाचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 7:58 PM

गड आला पण, सिंह गेला या शालेय पुस्तकातील धड्यांमधून बालपणीच तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा

मुंबई - बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोल स्‍टारर 'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर' आणि दीपिका पादुकोण स्‍टारर 'छपाक' रूपेरी पडद्यावर एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आले. दोन्ही सिनेमाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी यात तान्हाजीने कमाईच्या बाबतीत छपाकला बरेच मागे टाकले. तानाजी चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकीकडे तानाजी चित्रपटाचं कौतुक होत असताना, चित्रपटात काही बाबींचा अभाव जाणवतोय. यास तान्हाजी यांच्या वंशजांनीही दुजोरा दिला आहे. 

गड आला पण, सिंह गेला या शालेय पुस्तकातील धड्यांमधून बालपणीच तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा अनेकांनी वाचली आहे. अनेकांनी अभ्यासली आहे. त्यावेळी, चौथीच्या पुस्तकात हे नाव तानाजी असं होतं. मात्र, दिग्दर्शकाने चित्रपटात आणि चित्रपटाचे नाव तान्हाजी असे ठेवले आहे. त्यामुळे, अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला, तर हिंदी चित्रपट असल्याने तान्हाजी हे नाव ठेवण्यात आले, असेही काहींनी म्हटले. मात्र, तानाजी मालुसरेंचं खरं नाव तान्हाजी हेच असल्याचं त्यांच्या वंशजांनी म्हटलंय. तर, तानाजी चित्रपटातील शेवट अनेकांना पंसतीस उतरत नाही. कारण, तानाजी धारातिर्थी पडल्यानंतर शेलार मामा आणि सुर्याजी यांनी सुत्रे हातात घेत विजयी शेवट केला होता. 

इतिहासातील पुस्तकानुसार, तान्हाजी धारातिर्थी पडल्यानंतर मावळे माघारी फिरले होते. त्यावेळी, शेलार मामांनी मावळ्यांवर शाब्दीक प्रहार केला होता. तुमचा बाप इथं मरून पडलाय अन् तुम्ही भागूबाईसारखं पळताय. मी परतीचे दोरखंड केव्हाच कापले आहेत, आता शत्रूशी युद्ध खेळून मरा किंवा गडावरुन उड्या टाकून जीव द्या, अशा शब्दात शेलार मामांनी मावळ्यां खडसावत, त्यांमधील लढाऊ बाणा जागवला होता. मात्र, चित्रपटात तसं चित्रण नाही. त्यामुळे, तो इतिहास तान्हाजींच्या वंशजांनाही रुचला नाही. शेलार मामाच डायलॉग चित्रपटात हवा होता, असे मालुसरेंच्या वंशजांनी म्हटलंय. विशेष म्हणजे यशवंती नावाच्या घोरपडीचा इतिहासही गड आला पण सिंह गेला, या पुस्तकात आहे. पण, चित्रपटात तेही पाहायला मिळत नाही.  

दरम्यान ''तानाजी मालुसरेंची जन्मभूमी ही गोडावली, तेथे शंकराच एक मंदिर आहे. तानाजीरावांच्या वडिलांना 8 वर्षांनी तान्हाजी झाले. त्यावेळी, ते शंकराचे भक्त होते, तेथे तपनेश्वराचे मंदिर. या तपनेश्वराच्या मंदिरात महाशिवरात्री एकादशीच्या दिवशी तान्हाजी मालुसरेंचा जन्म झाला. म्हणून त्यांचं नाव तान्हा.. असं ठेवलंय. त्यामुळे, ते तानाजी नसून तान्हाजी आहेत,'' असे तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांनी सांगितलंय. 

टॅग्स :तानाजीबॉलिवूडअजय देवगण