खारलँड बांधबंदिस्तीची कामे निकृष्ट दर्जाची
By Admin | Updated: June 6, 2015 22:47 IST2015-06-06T22:47:06+5:302015-06-06T22:47:06+5:30
रोहा तालुक्यात खारलँड विभागाने लाखो रुपये खर्च करून बांधबंदिस्तीची कामे केली आहे. ही कामे निकृष्ट दर्जाची झाली असून अन्नपूर्णा

खारलँड बांधबंदिस्तीची कामे निकृष्ट दर्जाची
- मिलिंद अष्टीवकर
रोहा - रोहा तालुक्यात खारलँड विभागाने लाखो रुपये खर्च करून बांधबंदिस्तीची कामे केली आहे. ही कामे निकृष्ट दर्जाची झाली असून अन्नपूर्णा आणि बोरकस कोटा या खारलँडच्या कामांमुळे तालुक्यातील पश्चिम खोऱ्यातील यशवंतखार, सानेगाव, डोंगरी वावेपोटगे या पंचक्रोशीतील हजारो एकर शेती खारे पाणी शेतात शिरत असल्याने धोक्यात आली आहे.
रायगड जिल्हा हा पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. खारलँड विभाग अस्तित्वात नसताना स्थानिक शेतकरी आपल्या शेतीचे रक्षण करण्यासाठी जोड पद्धतीने खांड बांधत होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी तुटपुंजी साधनसामुग्री व कमी पैशाच्या खर्चात आपल्या शेतीचे रक्षण केले होते. परंतु कारभार खारलँड विभागाच्या हाती गेल्यापासून ठेकेदाराने खांड बांधून पूर्ण करण्याच्या अगोदरच ठेकेदाराला बिले अदा होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. शेतकऱ्यांनी कापलेल्या भातशेतीत पाणी गेल्याने भातपिकाचे नुकसान होत आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत आदेश दिले जातात. परंतु शेतकऱ्यांना मात्र नुकसान भरपाई मिळत नाही. मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या वाळू उपशामुळे समुद्राचे खारे पाणी भरतीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर शेतांमधून घुसत आहे.
येथील विकासकांच्या उद्घाटनानिमित्त आ. पंडित पाटील करंजवीरा येथे आले होते. दुपारची भरतीची वेळ असल्याने कार्यकर्त्यांनी आमदारांना खारलँडच्या कामाची परिस्थिती दाखविण्यास नेले. अन्नपूर्णा व बोरकस कोटा योजनेवर खारलँड विभागाने मागील ५ वर्षात लाखो रुपये खर्च करूनही फायदा नसल्याचे यावेळी दिसून आले. येथील निकृष्ट दर्जाच्या कामाला प्रभारी अधीक्षक अभियंता जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. खारलँड विभागाच्या धोरणामुळे देशोधडीला लागल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.